नांदेड l राष्ट्रीय आरोग्य अभियानातील मागील २३ वर्षापासून कार्यरत करार तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेऊन सुद्धा अद्यापही याची अंमलबजावणी न करणे व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या मागण्यांकडे डोळे झाक करणे या बाबीस कंटाळून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कंत्राटी कर्मचारी एकत्रितपणे काल १९ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत संपावर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे .


सदर संघटनेच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा शल्यचिकित्सक आदि आरोग्य विभागाच्या प्रमुखांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन संघटनेने संप पुकारला असल्याचे लेखी स्वरूपात कळविले होते .


महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रमुख पुढाकारातून राष्ट्रीय आरोग्य अभियान ग्रामीण व शहरी विभागातील नांदेड जिल्ह्यातील विविध संघटनांच्या कार्यरत अधिकारी व कर्मचारी यात जिल्हा समन्वयक श्री जुनेद सलीम श्री माणिक गिरगावकर-जिल्हा अध्यक्ष , श्री बाळासाहेब चौधरी- जिल्हा सचिव तसेच श्री संजय देशमुख – राज्य सामान्वयक यांच्या समन्वयातून एकूण १२०० च्यावर अधिकारी व कर्मचारी संयुक्त रित्या एकत्रितपणे लढयात उतरले आहेत .


महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी महाराष्ट्र राज्य विधिमंडळ २०२५ या वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात मुद्दा क्रमांक ५२ नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे निर्णय घेतला आहे .त्यानुसार त्यांना आरोग्य सेवेतील मान्यता व प्राप्त सम कक्ष पदावर सामावून घेण्यात येईल असे सांगितले होते .परंतु अभिभाषणामधील या निर्णयाच्या अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

संपूर्ण राज्यभरात अशाच स्वरूपाचे उग्र प्रकारचा संप १९ ऑगस्ट पासून सुरू झालेला असल्याने शासनाने वेळीच वरील प्रकरण गांभीर्य पूर्वक हाताळणे आवश्यक आहे .


