नांदेड| सचखंड श्री हजूर साहिब ही श्रद्धा, त्याग आणि बलिदानाची पवित्र भूमी असून या भूमीवर होत असलेला शहीदी समागम हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत प्रतीक असल्याचे प्रतिपादन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले.


‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग व राज्यस्तरीय समागम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोदी मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.


मुख्यमंत्री मान म्हणाले की, सेवा हाच खरा धर्म असून या शहीदी समागमाच्या माध्यमातून समता, बंधुता आणि करुणेचा संदेश संपूर्ण देशभर पोहोचत आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार, कार्य व त्याग पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असून त्यांचा जीवनप्रवास नव्या पिढीसमोर असणे अत्यंत आवश्यक आहे. यावेळी त्यांनी नांदेड येथील पंजाब भवनच्या अद्ययावतीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणाही केली.



श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार : रामेश्वर नाईक
राज्य समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या निमित्ताने त्यांचा इतिहास घराघरात पोहोचला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपट व गीतांचे सादरीकरण करण्यात येत असून, यामुळे त्यांचा जीवनसंघर्ष नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.

नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत होत असलेल्या या शहीदी समागमासाठी देशातील विविध राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असून, हा कार्यक्रम सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार डॉ. तुषार राठोड, संत ज्ञानी हरनाम सिंह जी, पोहरादेवीचे महंत बाबुसिंग महाराज, संत बाबा बलविंदर सिंह जी, महंत रघु मुनी यांच्यासह अनेक संत, महंत व मान्यवर उपस्थित होते.

