
हिमायतनगर, अनिल मादसवार| पवित्र श्रावण महिन्याला सोमवारपासून सुरुवात होत आहे. हि बाब लक्षात घेता श्री परमेश्वर मंदिरासह परिसराची स्वच्छता आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त, बंद पडलेले पथदिवे , रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीची कोंडी व महिलांना अडचण होणार नाही या सर्व बाबीवर तातडीने उपाययोजना कराव्यात. यासाठी संबंधित विभागाने विशेष पथक तयार करून विशेष लक्ष द्यावे. अश्या सूचना उपविभागीय अधिकारी श्री अविनाश कांबळे यांनी दिल्या.


ते शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्ट रोजी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात श्रावण मास उत्सव व यात्रेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीस उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मंदिर कमिटीच्या संचालकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यंदाच्या पवित्र श्रावण महिन्यात आलेले सण उत्सव आणि श्री परमेश्वर मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रम पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत व आनंदाने संपन्न व्हावे यासाठी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे हदगाव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. तत्पूर्वी मंदिरात दाखल होताच अधिकाऱ्यांनी श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच मंदिराचा इतिहास जाणून घेऊन मंदिराचे व्यवस्थापन स्वच्छता याचे कौतुक करून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वार आणि गणेश द्वाराच्या बाजूने फिरून परिस्थितीचा आढावा घेतला.


यावेळी पुढे बोलताना उपविभागीय अधिकारी श्री कांबळे म्हणाले कि, हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर जागृत देवस्थान आहे. त्यामुळे श्रावण मासानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असते. सर्वाना महादेवाचे दर्शन सुलभ होणे गरजेचे आहे, यासाठी हि विशेष बैठक ठेवण्यात आली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शांततेत दर्शन होण्यासाठी मंदिर समईटीने विशेष दर्शन रांगा लावावी. दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्ताना पिण्याचे स्वच्छ पाणी आणि इतर व्यवस्था कराव्यात. कोणत्याही असुविधेचा सामना भाविकांना करण्याची वेळ येणार नाही याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी. आरोग्य विभागाने भाविकांच्या आरोग्यासाठी एक पथक दर सोमवारी तैनात ठेऊन सुविधा पुरविण्यासाठी अंबुलेन्स आदी सेवा द्यावी. बांधकाम खात्याने व नगरपंचायत प्रशासनाने प्रामुख्याने शहरातील मंदिराच्या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून भाविकांना सुलभ रस्ता करून द्यावा. जेणेकरून भाविकांना अपघाताचा सामना करावा लागणार नाही. तसेच शहरात फिरणारी मोकाट जनावरे मंदिर परिसरात फिरकणार नाही, यासाठी बैठे पथक तैनात ठेवावे. तसेच मंदिरासह परिसराची दररोज स्वच्छता ठेऊन भाविकांना घाणीचा सामना करावा लागणार नाही याची काळजी घ्यावी.



महावितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत झाला पाहिजे यासाठी जातीने लक्ष देणे आवश्यक आहे. मंदिर परिसरातील आणि शहरातील मुख्य हाईमेक्स लाईट बंद आहेत, ते तात्काळ दुरुस्त करून घ्यावीत जेणेकरून भाविकांना अंधाराचा सामना करण्याची वेळ येणार नाही. पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरात वाहतूक विस्कळीत होणार नाही यासाठी ट्रैफिक बंदोबस्त ठेवावा. मंदिरात व मंदिरात येण्याजाण्यास अडथळा होईल अश्या प्रकारे कुणीही वाहने आणू नये, मंदिराने पार्कींगसाठी वेगळी व्यवस्था करावी. अश्या सूचना सबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचारी याना केल्या. या बैठकीला उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार पल्लवी टेमकर, मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव देवकते, नायब तहसीलदार सूर्यकांत तांडेवाड, मंडळ अधिकारी बी.एम. चव्हाण, तलाठी सचिन जावरकर, तलाठी समाज बिऱ्हाडे, तालुका आरोग्य अधिकारी संदेश पोहरे, श्री गायकवाड, नागमवाड सर, मारोती हेंद्रे, बाळू हरडपकर, निलेश यशवंतकर, कोतवाल हरीश गिरी, संचालक प्रकाश कोमावार, प्रकाश शिंदे, लताबाई पाध्ये, लताबाई मुलंगे, मथुराबाई भोयर, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलासराव वानखडे, लिपिक बाबुराव भोयर, प्रकाश सांभाळकर, देवराव वाडेकर, आदींसह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


हिमायतनगर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मी मागील काही दिवसापासून प्रयत्न करत आहे, मात्र मंदिर परिसरातील हातगाडे आणि अतिक्रमण करून लावली जाणारी वाहने याना शिस्त लावण्यस्तही मंदिर प्रश्नाने सहकार्य करणे आवश्यक आहे. मंदिराने आम्हाला पूर्ण सहकार्य केल्यास अस्तव्यस्त असलेल्या वाहतुकीला सुतारखे सरळ करून मंदिरात भाविकांना व शाळेत जाणाऱ्या मुलींना कोणतीही अडचण भासू देणार नाही असा विश्वास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी यावेळी दिला. तर नगरपंचायत प्रशासनाने देखील सर्व सूचनांचे पालन करण्यासाठी पथदिवे दुरुस्ती, कचरा सफाई, आणि मोक्कात जनावरांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन यावेळी दिले. बांधकाम विभाग आणि महावितरणचा एकही अधिकारी कर्मचारी या बैठकीला उपस्थित झाला नव्हता त्यामुळे दूरधवनीवरून त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या.



