
लोहा| रमजान या पवित्र महिन्यात उपवास करून अल्लाहची उपासना केली जाते. या पवित्र काळात हिंदू-मुस्लिम असा कोणताही भेदभाव न ठेवता सर्वजण एकत्र येतात. गेल्या २७-२८ वर्षांपासून लोहा-कंधार शहरात दावत-ए-इफ्तारचे आयोजन सातत्याने केले जात असून त्यातून, सामाजिक एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ होत असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.


लोहा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोह्याचे उपनगराध्यक्ष करीम शेख यांच्या पुढाकाराने त्यांच्या निवासस्थानी दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, बीडीओ कुलकर्णी, नगराध्यक्ष शरद पवार, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, युवा नेते सचिन पाटील चिखलीकर, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, गटनेते भास्कर पवार, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, गणेश बगाडे, सतीश निखाते, पंकज पवार, मारुती जंगले, तुकाराम दाढेल, राजेश बोडके, बालाजी खिल्लारे, निहाल अहमद, सलीम शेख, सिकंदर शेख, अनिल धुतमल, इमाम लदाफ यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.



यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले की, दावत-ए-इफ्तारच्या माध्यमातून समाजात एकोप्याचा आणि बंधुभावाचा संदेश दिला जातो. गेल्या सत्तावीस-अठ्ठावीस वर्षांपासून रमजान महिन्यात लोहा-कंधार येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. उपनगराध्यक्ष करीम शेख दरवर्षी सर्वांना निमंत्रित करतात. ईदच्या दिवशीही शीरखुर्म्याची दावत दिली जाते. हिंदू-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने एकत्र नांदण्याची ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू असून हा सामाजिक एकोपा अधिक वृद्धिंगत व्हावा, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर उपनगराध्यक्ष करीम शेख यांनी उपस्थित मान्यवरांचे दस्ती टोपी देऊन स्वागत केले. कार्यक्रमानंतर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर आणि नगराध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत तरुणांनी मोठ्या प्रमाणात फोटो व सेल्फी काढत आनंद व्यक्त केला.



