Anandacha Ration : शासनाने ‘आनंदाचा शिधा’ योजना गुंडाळली की काय…?

हदगांव, शेख चांदपाशा| रेशनकार्ड लाभार्थ्यांचे तोंड गोड व्हावे या उद्देशाने महायुती सरकारचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ ही योजना सुरू केली होती. मात्र, गत काही महिन्यांत सण-उत्सव होऊन देखील आनंदाचा शिधा मिळाला नाही. त्यामुळे शासनाने ही योजना गुंडाळली का..? अशी चर्चा तालुक्यात ऐकवायास मिळत आहे.


गणेशोत्सव ,दसरा, दिवाळी, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण-उत्सव काळात स्वस्त धान्याच्या दुकानातून आनंदाचा शिधा १०० रुपयांत देण्यात आला होता मात्र, लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागल्यानंतर ही योजना थांबली. पुढे विधानसभेची निवडणूक झाली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे रामनवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून शासनाकडून आनंदाचा शिधा वितरित केला जाईल, अशी अपेक्षा लाभार्थ्यांना होती. मात्र, हदगांव तालुक्यातील रेशन दुकानात आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही. त्यामुळे रेशन धारकांच अपेक्षा भंग झाला आहे.




