हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरातील उमरचौक परिसर बुधवारी अक्षरशः दहशतीच्या छायेत गेला, जेव्हा पैशांच्या वादातून दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाली. तलवार व चाकूसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करत करण्यात आलेल्या या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून, आणखी तीन जण जखमी झाले आहेत.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाकीर हुसेन (वय 38, रा. उमरचौक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आठवडी बाजाराच्या दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उमरचौक कमानजवळ ही घटना घडली. उसने दिलेल्या पैशांवरून वाद निर्माण झाला आणि आरोपींनी “तु हमारे आदमी को पैसे मांगता क्या?” अशी धमकी देत शिवीगाळ केली.

यानंतर सात जणांनी एकत्र येत चाकू व तलवारीने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला चढवला. भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या फिर्यादीच्या भावावर आणि काकावरही हल्ला करण्यात आला, ज्यामुळे तेही जखमी झाले. या प्रकरणी शेख ईलीयास, शेख एजाज, शेख जावेद, शेख फेरोज, शेख अफरोज, शेख इम्रान उर्फ ईमु आणि शेख महेमुद उर्फ तहारी (सर्व रा. हिमायतनगर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



गंभीर जखमी व्यक्तीला प्राथमिक उपचारानंतर नांदेड येथे हलविण्यात आले असून, अन्य जखमींवर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात दाखल होत एकमेकांविरुद्ध तक्रारी देत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी पाण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातूनच हा प्रकार उफाळल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. विशेष म्हणजे, मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीलाही हल्ल्याचा फटका बसल्याने संताप व्यक्त होत आहे.

सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हाके यांच्या मार्गदर्शनाखालची पोलीस निरीक्षक अमोल भगत व त्यांचे पथक करीत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. या घटनेमुळे आठवडी बाजारात आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.



