मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक घडामोड घडली असून, सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या पदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

विश्वसनीय सूत्रांनुसार, शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तातडीची बैठक
या महत्त्वपूर्ण निर्णयापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते, तर सुनेत्रा पवार या ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाल्या होत्या. बैठकीत शपथविधीच्या तयारीसह पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा करण्यात आली.


प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आमदार व खासदारांना शपथविधीसाठी निमंत्रण पाठवण्यात आले असून दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महिला नेतृत्वाला नवी दिशा
आजवर महाराष्ट्रात अनेक प्रभावी महिला नेत्यांनी विविध पदांवर काम केले असले तरी, उपमुख्यमंत्री पदावर महिला नेतेपदाची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा केवळ राजकीय निर्णय न राहता महिला नेतृत्वाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे.
या निर्णयानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत असून, अनेक नेत्यांनी सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी या निर्णयाकडे भविष्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले आहे.
अजितदादा पवार यांच्या पश्चात पक्ष व सरकारची जबाबदारी सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांची निवड ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे. उद्याच्या शपथविधीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, महाराष्ट्राच्या राजकारणात हा क्षण इतिहासात नोंदवला जाणार आहे.

