नांदेड| जिल्ह्यात उद्या दि. 10 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत असून ही परीक्षा 112 परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा तणाव अथवा भीती न बाळगता निर्भय व सुरक्षित वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. परीक्षेदरम्यान 100 टक्के कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात दि. 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्यामार्फत सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष देण्यात येणार असून, काही ठिकाणी बैठे पथक तैनात करण्यात आले आहे.

परीक्षा पारदर्शक, सुरळीत व शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी झूम सुविधेद्वारे थेट निरीक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात दोन नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) कार्यान्वित करण्यात आले असून, सर्व परीक्षा केंद्रे सीसीटीव्हीच्या कडक निगराणीखाली ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ, कॉपी किंवा अन्य गैरप्रकार आढळून आल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.



