नांदेड| अचानक आलेल्या महापुरामुळे नांदेड जिल्ह्यातील हसनाळ, रावणगाव व भेंडेगाव या गावांना मोठा फटका बसला. घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले, शेतातील उभे पीक नष्ट झाले, पशुधनाचेही नुकसान झाले. यामुळे गावकर्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.


या कठीण परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब नांदेड पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला. क्लबच्या वतीने गावातील शेकडो नागरिकांना तांदूळ, डाळ, पीठ, तेल, बिस्किटे, ब्लँकेट, कपडे यांसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या मदतकार्यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मितेश मालीवाल, सचिव डॉ. बी. आर. मालू, उमेश गरुडकर, रेखा गरुडकर, कैलास काला, बंग, सुभाष मामीडवार, भारतीया, शिंदे, कमटलवार, भोसीकर, आणि मुखेड रोटरी क्लबचे डोईबोळे हे मान्यवर विशेष उपस्थित होते. सर्व पदाधिकारी व स्वयंसेवकांनी गावोगावी जाऊन प्रत्यक्ष गरजुंच्या हातात मदतीच्या पिशव्या दिल्या. मदत मिळाल्यानंतर ग्रामस्थांच्या चेहर्यावर हास्य खुलले होते.


गावकर्यांनी सांगितले की, पूरानंतर प्रथमच कोणी मदतीचा हात पुढे केला. या मदतीमुळे आमच्यात जगण्याचा नवा उत्साह निर्माण झाला आहे. अशी प्रतिक्रिया दिली. रोटरी क्लब नांदेडने केवळ साहित्य वाटपच केले नाही, तर दिलासा देणारे शब्द व मानसिक आधारही दिला. या उपक्रमामुळे समाजातील बंधुभावाचे उत्तम उदाहरण घडले असून पूरग्रस्तांच्या मनात पुन्हा आशेचा किरण जागला आहे.

रोटरी क्लब मुखेडच्या वतीने अन्नदान प्रक्रिया नियमित सुरु आहे. पुर आल्यानंतर दुसर्यादिवशी पासुन मुखेड व नांदेड क्लब च्या पदाधिकार्यांनी धाव घेवुन गावकर्यांना दिलासा देत मदतीचा हात दिला. यावेळी बसवराज शिवपूजे, सत्यवान गरुडकर, संजय रेड्डी, पवन पोतदार, पद्दमवार, जाधव व इतर रोटरीक्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

