Dr vrishali kinhalkar : विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे – कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर

IMG 20250908 213335 Dr vrishali kinhalkar : विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे – कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर

नांदेड (प्रतिनिधी) “विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचन, अभ्यास, व्यायाम करून निसर्गाच्या जवळ गेले पाहिजे. मोबाईलचा वापर एक तासापेक्षा जास्त वेळ करणे टाळावे. विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष ठेवले पाहिजे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा प्रसिद्ध कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी केले.

श्री शिवाजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिकनगर, नांदेड यांच्या वतीने आयोजित मातोश्री स्व. सौ. सुलोचनाताई गुरुनाथराव कुरूडे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रा. वैजनाथराव कुरूडे होते. तर व्यासपीठावर माजी आमदार गुरुनाथराव कुरूडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर कुरूडे, उपमुख्याध्यापक सदानंद नळगे, डॉ. मधुकर शिंदे, प्रा. वसंत राठोड, सय्यद जमील, सत्यवान पारेकर, आर. सी. गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. किन्हाळकर पुढे म्हणाल्या की, “शिक्षण म्हणजे फक्त शाळेतील पुस्तकापुरते नसून ते निरंतर प्रक्रिया आहे. सजिव-निर्जीव गोष्टींपासूनही शिकता येते. प्रत्येक भाषेत, जातीत, धर्मामध्ये ‘आईची भाषा’ सर्वांना समजते. पण आजही मुलगा जन्मला की आनंद साजरा होतो आणि मुलगी जन्मली की तितका आनंद होत नाही, हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे.”

या वेळी माजी आमदार गुरुनाथराव कुरूडे म्हणाले की, “संस्थेच्या उभारणीत स्व. सौ. सुलोचनाताई कुरूडे यांचा त्याग अतुलनीय आहे. शिक्षकांच्या पगारासाठी त्यांनी स्वतःचे दागिने संस्थेसाठी दिले. अशिक्षित असूनही त्यांनी दाखवलेला त्याग समाजासाठी प्रेरणादायी आहे.”

स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 8 वी गटात प्रथम – सचिन सिद्धांत टोंगळे, द्वितीय – कु. संचिता सुभाषराव अष्टेकर, तृतीय – आलिशा जाकीर शेख, उत्तेजनार्थ – अपूर्वा अनिल सोनकांबळे तर इयत्ता 9 वी ते 12 वी गटात प्रथम – आविष आनंदराव वाघमारे, द्वितीय – धनंजय बाबू गावंडे, तृतीय – श्रेया बालाप्रसाद पांचाळ, उत्तेजनार्थ – श्रावणी मनोज पाटील यांनी यश मिळवले.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत 130 शाळांमधील 130 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम कौसल्ये यांनी केले, तर आभार अपर्णा लाडेकर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top