नांदेड| जिल्ह्यातील अनेक कामगारांकडे नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा व फॉरेस्टच्या जमिनी वडिलोपार्जित व पारंपरिक आहेत. त्यांचा त्या जमिनीवर दोन ते तीन पिढ्यापासून ताबा आहे. अनेक ठिकाणच्या जमिनी सुपीक व वहितीत आहेत परंतु त्या जमिनीचे पट्टे व सातबारा अजून काहींना मिळाले नाहीत.


वन विभागामार्फत ताब्यातील जमिनीवरून मजूर असलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचे कट कारस्थान फॉरेस्ट च्या कर्मचारी अधिकारी यांच्या मार्फत नांदेड जिल्ह्यात राबविले जात आहे. शेतात खड्डे करून झाडे लावण्याची योजना शासना मार्फत राबविल्या जात आहे. या ब्रिटिश कालीन कटू नीती विरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) कामगार संघटनेने दंड थोपटले असून मजूर असलेल्या कामगारांना शेतकरी बनविण्याचा विडा उचललेला आहे. सीटू चे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली १८ ऑगस्ट रोजी कॉ.अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा विद्युत भवन नांदेड येथून दुपारी २ वाजता मजूर असलेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे.

भोकर,माहूर,किनवट,मुदखेड, हिमायतनगर येथील पीडित शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्त मोर्चाची तयारी सुरु केली असून, चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. नाशिक येथे ४५ हजार पट्टे करून देण्यात लाल बावट्याला यश आले असून, त्याच धरतीवर नांदेड जिल्ह्यातील अल्पभूधारक मजूर शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे व सातबारा मिळवून देण्यात येणार आहे. वन हक्क कायदा २००६ ची प्रभाविपणे अंमलबजावणी करावी,१३ डिसेंबर २००५ पूर्वी पासून ताबा असलेल्या सर्व जमिनी कास्तकारांच्या नावे करून द्याव्यात. शेतामध्ये खड्डे खोदून झाडे लावण्याची कार्यवाही तातडीने थांबविण्यात यावी.ज्या गावातून दावे दाखल करण्यात येणार आहेत त्या गावामध्ये तात्काळ विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे.सादर करण्यात येणारे दावे तात्काळ उप विभागीय समिती कडे पाठविण्यात यावेत.तसेच जिल्हा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी महोदयांनी त्या दाव्याना अंतिम मंजूरी द्यावी.काही शेतकऱ्यांच्या सातबारायावरील नावे उडवून सरकारी पट्टेदार करण्यात आले आहे. ती दुरुस्ती ताबडतोब करून द्यावी. आदी कायदेशीर मागण्या सदरील मोर्चा मध्ये करण्यात येणार आहेत.


मोर्चा दुपारी १२ वाजता काढण्यात येईल. ज्यांना दावे दाखल करावयाचे आहेत त्यांनी सोबत आधार कार्ड, रेशन कार्डची छायांकित प्रत सोबत आणावी आणि आशा सर्व गरजू कास्तकारांनी मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने करण्यात आले आहे. सदरील मोर्चाचे नेतृत्व सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार, कॉ. लता गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.जयराज गायकवाड, कॉ. बालाजी पाटील भोसले,कॉ. देवानंद कुंचेवार,संतोष वाघमारे,दशरथ वाघमारे,गजानन खुपसे,जळबा राजकौर,केशव वाघमारे,शंकर बोथकर, विजय सूर्यवंशी,जळबा वाघमारे,संग्राम ननुरे,सुनील वाघमारे, कुलदीपसिंग ठाकुर,लालासाहेब पागे, कॉ.मंगेश वट्टेवाड आदिजन करणार आहेत. अशी माहिती नांदेड जिल्हा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.


