हिमायतनगर (प्रतिनिधी) सिरंजनी ते शेलोडा (इ.जि.मा.–14) या मार्गावरील रस्त्याचे काम गुत्तेदार रुद्रा कन्स्ट्रक्शन नांदेड आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे चुकीच्या पद्धतीने केल्याने शेतकऱ्याच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी संबंधित गुत्तेदार तसेच कनिष्ठ अभियंता आर.डी. वाघमारे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करेवाड यांनी तालुका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.


सिरंजनी येथील पवन नारायण करेवाड यांनी तहसीलदारांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, सिरंजनी शिवारातील गट क्रमांक 369 (प्रेमाला नारायण करेवाड) व गट क्रमांक 377 (मेघा पवन करेवाड) ही त्यांची शेती रस्त्यालगत आहे. रस्त्याचे काम करताना अंदाजपत्रकात असलेली नाली खोदकामाची कामे व सीडीवर्क मुद्दाम न केल्यामुळे पावसाचे साचलेले पाणी थेट त्यांच्या शिवारात घुसले.

रस्त्याची उंची वाढवून पाण्याचा निचरा न देता काम केल्याने गट क्रमांक 369 मधील कापसाचे नुकसान झाले असून गट क्रमांक 377 मधील सोयाबीन पाण्याखाली जाऊन चिबडले आहे. नाल्याकाठची जमीन खरडून गेल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.


गावातील पंच आणि नागरिकांच्या उपस्थितीत अनेकदा नाली खोदकाम व सीडीवर्कबाबत सूचना करण्यात आल्या होत्या, मात्र गुत्तेदार व अभियंत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. या निष्काळजीपणामुळे उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्त्रोत नसलेल्या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होऊन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून तातडीने नाली व सीडीवर्क करून पाण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी करेवाड यांनी तहसीलदारांकडे केली आहे.


