नांदेड/माहूर (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावरील श्री दत्त शिखर संस्थानचे प्रमुख महंत परमपूज्य मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती (मालक) यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण माहूरगड परिसरात शोककळा पसरली असून भक्तगणांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (रविवार) दुपारी ३ वाजता दत्त शिखरावर धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार होणार आहेत.


चार दशकांहून अधिक काळ गादीवर सेवा
१९७८ साली धार्मिक परंपरेनुसार गादीवर विराजमान झाल्यानंतर महंत मधुसूदन भारती महाराजांनी अखंडपणे संस्थानची सेवा केली. त्यांनी दत्तसंप्रदायातील परंपरा जपत अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेला. त्यांच्या कार्यकाळात दत्त शिखर संस्थान हे केवळ धार्मिक स्थळ न राहता भक्तांसाठी श्रद्धा आणि मार्गदर्शनाचे केंद्र बनले.

साधेपणातून घडवले मोठे कार्य
महंत महाराजांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधे, शांत आणि भक्तिमय होते. प्रवचन, पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी असंख्य भाविकांना अध्यात्मिक दिशा दिली. त्यांच्या शिकवणीतून नैतिक मूल्ये, संस्कार आणि समाजहिताचा संदेश सातत्याने दिला जात होता.


अंतिम दर्शनासाठी भक्तांची गर्दी
महाराजांच्या निधनाची बातमी समजताच माहूरसह जिल्हाभरातून भाविकांनी दत्त शिखराकडे धाव घेतली आहे. अंतिम दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून संत-महंत, विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे.

प्रशासनाचे आवाहन
अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच आरोग्य व इतर सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी भाविकांनी नियोजनपूर्वक प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. काही कालावधीत गडावरील वाहतूक नियंत्रित केली जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.
महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या निधनाने दत्तसंप्रदायासह संपूर्ण आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांची उणीव दीर्घकाळ जाणवत राहणार आहे.



