हिमायतनगर (अनिल मादसवार) महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ग्रामपंचायतांवर लोकनियुक्त प्रतिनिधींची गरज अधोरेखित करत प्रशासक पद्धत लोकशाहीविरोधी असल्याचा ठाम सूर मांडण्यात आला आहे.


निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायती या ग्रामीण लोकशाहीचा कणा असून, लोकनियुक्त सरपंच व सदस्यांमार्फतच विकासकामे प्रभावीपणे राबवली जातात. मात्र प्रशासक नेमल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व कमी होऊन ग्रामविकास प्रक्रियेला खीळ बसेल. प्रशासकांना स्थानिक प्रश्नांची पुरेशी जाण नसल्याने निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात, असेही नमूद करण्यात आले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील सरपंच संघटनेने स्पष्ट केले की, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास लोकप्रतिनिधींनाच संधी देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ ग्रामपंचायत निवडणुका घेऊन प्रशासक नेमणुकीचा निर्णय रद्द करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.



हे निवेदन हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर लक्ष्मणराव गोपतवाड यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकीय वर्तुळात चर्चा – हिमायतनगर ग्रामपंचायत संघटनेने दिलेल्या या निवेदनामुळे तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मुद्द्यावर सरकार कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

