हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या नामांकन छाननीनंतर महायुतीतील घरगुती संघर्ष शिगेला पोचला असल्याचे दिसून आले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणुकीत आमने-सामने दिसून येत असल्याने आपसी फाटाफुटीमुळे इतर पक्षांचे पारडे जड होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र महाविकास आघाडीतेही हीच परिस्थिती असल्याने नगरपंचायत निवडणुक अटीतटीची हॊईल असे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत.


हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर हिमायतनगरच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडत असून, राज्यातील महायुती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजप – शिवसेना (शिंदे) – राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर तीव्र संघर्ष उफाळून आला आहे. परिणामी महायुतीतील पक्षच एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.


मागील पंचवार्षिकातील सत्ता वाटप, पण आता पूर्ण वेगळी समीकरणे
हिमायतनगरमध्ये मागील पाच वर्षांत अडीच वर्ष काँग्रेस आणि अडीच वर्ष शिवसेना (उबाठा गट) सत्तेत होती. मात्र यंदा परिस्थिती पूर्ण बदलली असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शिवसेना (उबाठा) हेही पक्ष स्वबळावरच निवडणूक मैदानात उतरत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. यामुळे एकेकाळी स्थिर असलेली आघाडीची समीकरणे पूर्णपणे ढासळली असून, “कोणाचा झेंडा नगरपंचायतीवर फडकेल?” हे मोठे कोडे बनले आहे.


लोकसभा-विधानसभा युती एक, पण स्थानिक लढत वेगळी
वरिष्ठ पातळीवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत महायुती व महाविकास आघाडी अशा स्वरूपात सामूहिक लढती झाल्या. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मात्र सर्वच पक्ष आपले स्वतंत्र वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे उमेदवारीवरून दिसून आले आहे.

अतिचुरस – सर्व पक्ष प्रतिष्ठेची लढाई मानत
हिमायतनगर नगरपालिका ही छोट्या आकाराची असली तरी राजकीय महत्व, जातीय मते, स्थानिक गटबाजी आणि विकास निधी, यामुळे ही निवडणूक सर्व पक्षांची प्रतिष्ठेची ठरली आहे. यामुळे पुढील काही दिवसांत साम-दाम-दंड-भेद या सर्व राजकीय युक्त्यांचा खुला वापर होणार, यात शंका नाही. पक्षांचे मोठे नेते, आजी – माजी आमदार, खासदार आणि जिल्ह्यातील प्रभावशाली मंडळींना ही लढत निव्वळ प्रतिष्ठेची बनली असून, प्रत्येक गट “आम्हीच पुढे” या निर्धाराने रणसंग्रामात उतरला आहे.
उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 21 – अंतिम चित्र त्यानंतरच
उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर असल्याने, या दोन दिवसांत अनेक गटचर्चा, दबाव-ताकद, साटेलोटे आणि समझोत्यांच्या हालचाली वेग घेणार आहेत. कोण पक्ष किती उमेदवार मागे घेतो?कोण अंतिम रिंगणात राहतो? महायुती एकत्र येते की पूर्णपणे स्वतंत्र लढत होते? हे सगळे प्रश्न 21 तारखेनंतरच स्पष्ट होणार आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार महायुतीची स्वतंत्र-स्वतंत्र लढत अधिक ठळकपणे दिसत असून, त्याचा थेट फायदा काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार यांच्या गटांना होण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत.


