हिमायतनगर (अनिल मादसवार ) हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिमायतनगर तालुक्याने थेट महावितरण प्रशासनाला जाब विचारत जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या सविस्तर निवेदनात महावितरणच्या कारभारावर गंभीर आरोपांची मालिका उघड करण्यात आली आहे.


महावितरण विभागाला देण्यात आलेल्या निवेदनानुसार, शहर व ग्रामीण भागात वारंवार होणारे वीज खंडितचे प्रकार , धोकादायक अवस्थेत लोंबकळणाऱ्या तारा, निकृष्ट दर्जाचे केबल काम, तसेच प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता अंदाजे व फुगवलेली बिले आकारली जात असल्याचे धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय डीपी दुरुस्ती, मीटर बदल, नवीन वीजजोडणी व डीपी लावणी यासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून, कामासाठी सर्रास पैशांची मागणी होत असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.


विशेष म्हणजे, २०१९–२०२० मधील कामांचे जुने फोटो दाखवून १०० टक्के काम पूर्ण झाल्याचा बनाव केल्याचा आरोप निवेदनात नमूद करण्यात आला आहे. तसेच केबल शिफ्टिंग व मीटर बदलासाठी घेतलेल्या रकमांचा स्पष्ट हिशोब नसल्याने भ्रष्टाचाराची शंका अधिकच गडद झाली आहे.



आधीचे आंदोलन, निलंबन… तरीही कारवाई ‘गुलदस्त्यात’?
यापूर्वीही वामनराव पाटील वडगावकर यांनी महावितरणच्या कारभाराविरोधात एक दिवस अर्धनग्न आंदोलन आणि त्यानंतर चार दिवस आमरण उपोषण छेडले होते. उपोषण सोडविताना प्रशासनाने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली; मात्र पुढील चौकशी व अंतिम कार्यवाही अद्यापही गुलदस्त्यात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.


याच पार्श्वभूमीवर पुन्हा आंदोलनाचा इशारा देत उच्चस्तरीय, निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीची प्रत ऊर्जा मंत्रालय, महावितरण मुख्य कार्यालय व स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. महावितरणच्या कथित भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी व व्यापारी वर्ग संतप्त झाला असून, आता प्रशासन खरोखरच कठोर पावले उचलते की पुन्हा एकदा प्रकरण दडपले जाते, याकडे संपूर्ण हिमायतनगरचे लक्ष लागले आहे.

“दोन दिवसांची सुट्टी संपल्यानंतरही महावितरण उपकार्यालयात एकही कर्मचारी हजर नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आज मी काही शेतकऱ्यांना घेऊन अभियंत्यांना भेटण्यासाठी गेलो असता संपूर्ण कार्यालय अक्षरशः ओस पडलेले दिसले. बुधवारी आठवडी बाजाराचा दिवस असताना कार्यालयाची अवस्था रविवारीसारखी होती. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपली कामे कोणाकडे मांडायची? महावितरणचा हा बेफिकीर कारभार आम्ही सहन करणार नाही; प्रशासनाने तात्काळ जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी,” असे वामनराव पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

