नांदेड | बिलोली तालुक्यात १८ ऑगस्ट रोजी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर मुखेड तालुक्यात ढगफुटी झाल्यामुळे लेढी नंदीचे पाणी आणि तेलंगणातील निझामसागर धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आल्याने मांजरा नदीला प्रचंड पूर आला. या पुरामुळे नंदीपाडा शेजारील सगरोळी, बोळेगाव, गंजगाव, येसगी, कार्ला, माचनूर, हुनगुडा, नागणी तसेच इतर गावांची हजारो हेक्टर शेती तीन दिवसांपासून पाण्याखाली आहे.


या भीषण परिस्थितीत शेतकरी बांधवांवर मोठे संकट ओढावले असून, अशा शेतकऱ्यांना त्वरीत पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यांनी केली आहे.


महाजन यांनी ई-मेलद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेता प्रधानमंत्री पिक विमा योजना भरलेल्या शेतकऱ्यांचे दावे तत्काळ मंजूर करण्याचे आदेश विमा कंपन्यांना द्यावेत, अशीही मागणी केली आहे.



