नांदेड, प्रतिनिधी| नांदेड जिल्ह्यात पावसातील अनियमितता आणि पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, आवश्यक मदतीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


बैठकीस आमदार बाबूराव कदम कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पर्जन्यमान, धरणांमधील पाणीसाठा आणि वीजपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला. पावसातील खंडाचा सर्वाधिक परिणाम सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांवर झाला असून, पावसाअभावी पिकांची वाढ खुंटल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. संभाव्य पीक नुकसानीचा विचार करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी वस्तुनिष्ठ माहिती शासनाकडे सादर करावी, अशा सूचना सावे यांनी दिल्या. तसेच दुष्काळसदृश्य परिस्थितीत उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.




पिण्याच्या पाण्याचे काटकसरीने नियोजन
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा आणि आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता याचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, पाणी आराखडा, पाणीसाठा आणि वीजपुरवठ्याबाबतची माहिती सादर केली. संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी चारा लागवड, केटीवेअर बंधारे आणि इतर उपाययोजनांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.

