नांदेड l २५- जिल्ह्यातील गावे स्वच्छ, सुंदर होण्यासाठी ‘कंपोस्ट खड्डा भरून आपलं गाव स्वच्छ ठेवू’ हे अभियान म्हणजे एक सुवर्णसंधी आहे. या अभियानात गाव स्तरावर शासकीय निमशासकीय कर्मचारी, महाविद्यालय विद्यार्थी, विविध सेवाभावी संस्था, बचत गट व मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे.


या अभियानाचा मुख्य उद्देश गाव पातळीवर कचऱ्याचे वर्गीकरण करून नाडेप खड्डयाच्या माध्यमातून सेंद्रीयखत निर्मिती तसेच घनकचऱ्याचे पुनर्वापर व व्यवस्थापन करून पर्यावरणपूरक विकास साधणे हा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेची सेंद्रीय क्रांती घडवून आणण्यासाठी ‘कंपोस्ट खड्डा भरून आपलं गाव स्वच्छ ठेवू’ हे अभियान १ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व गावात राबविण्यात येणार आहे.


जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या कुशल मार्गदर्शनात तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांचे नेतृत्वात या अभियानाची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व गावात सेंद्रीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी हे अभियान अतिशय महत्त्वपूर्ण असून याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व तालुकास्तरावरील गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.

या संपूर्ण मोहीमेची पडताळणी जिल्हा व तालुका स्तरावरील समन्वयक, प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल. नाडेप खड्यामध्ये भरलेला कचरा आणि खत निर्मितीची प्रक्रीया तपासली जाईल. या उपक्रमाच्या माध्यमातून गावोगावी सेंद्रीयखत निर्मिती सुलभ होणार असून पर्यावरणपूरक घनकचरा व्यवस्थापन प्रणालीस चालना मिळेल, कचऱ्याचा पुनर्वापर खत निर्मिती आणि शाश्वत स्वच्छतेच्या दृष्टीने ही मोहीम महत्वपूर्ण ठरणार आहे. गावातच सेंद्रीयखत तयार व्हावे कचऱ्यावर उपाययोजना आणि जनतेमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हीच या अभियानाची मुख्य संकल्पना आहे.

अशी होणार अभियानाची अंमलबजावणी..
२७ एप्रिल पूर्वी गाव स्तरावर दवंडी देणे व सूचना फलकांद्वारे अभियानाची माहिती प्रसारित करणे, २७ ते ३० एप्रिल गाव स्तरावर गावातील ओला व सुका कचरा संकलित करणे, १ ते १० मे गावात संकलित केलेला ओला व सुका कचरा नाडेप खड्यामध्ये भरणे, १ ते १५ सप्टेंबर तयार झालेल्या कंपोस्ट खताचा उपसा व वापरासाठी वितरण
सामुदायीक सहभाग महत्वाचा या अभियानात ग्रामपंचायत, महिला बचत गट, शेतकरी गट, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळी, महाविद्यालय विद्यार्थी, स्थानिक लोकप्रतिनिधींचा सक्रीय सहभाग निश्चीत करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, आरोग्य केंद्र आणि इतर सर्वजनिक स्थळांवर फलकांद्वारे तसेच दवंडीच्या माध्यमातून मोहिमेची माहिती प्रसारित केली जाईल.