जिल्ह्यात ‘कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ अभियान
नांदेड l २५- जिल्ह्यातील गावे स्वच्छ, सुंदर होण्यासाठी 'कंपोस्ट खड्डा भरून आपलं गाव स्वच्छ ठेवू' हे अभियान म्हणजे एक सुवर्णसंधी आहे. या अभियानात गाव स्तरावर शासकीय निमशासकीय कर्मचारी, महाविद्यालय विद्यार्थी, विविध सेवाभावी संस्था, बचत गट व मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश गाव पातळीवर कचऱ्याचे वर्गीकरण करून नाडेप खड्डयाच्या माध्यमातून सेंद्रीयखत निर्मिती तसेच घनकचऱ्याचे पुनर्वापर व व्यवस्थापन करून पर्यावरणपूरक विकास साधणे हा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेची सेंद्रीय क्रांती घडवून आणण्यासाठी 'कंपोस्ट खड्डा भरून आपलं गाव स्वच्छ ठेवू' हे अभियान १ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व गावात राबविण्यात येणार आहे.
...
