हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी सज्जातील तलाठ्यांकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान जाणीवपूर्वक कमी दाखवून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचा गंभीर आरोप होत आहे. शासनाकडून शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याच्या स्पष्ट सूचना असूनही तलाठ्यांनी केवळ 55 ते 60 टक्के नुकसान दाखवून शेतकऱ्यांना शासन अनुदानापासून वंचित केले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित तलाठ्यांना निलंबित करून शेतकऱ्यांचे उर्वरित अनुदान तातडीने जमा करावे, अशी मागणी उबाठा गटातर्फे करण्यात आली आहे.


अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या तसेच नाल्यालगतच्या शेतजमिनी खरडून गेल्या असून, बोरगडी, बोरगडी तांडा, कारला आणि सिबदरा येथील शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तरीदेखील बोरगडी सज्जाचे तलाठी केशव थळंगे यांनी नुकसान क्षेत्र कमी दाखवून शासनाकडे चुकीचा अहवाल सादर केला असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.


संतप्त शेतकऱ्यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे लेखी तक्रार दिली. संबंधित तलाठ्यांना स्पष्टीकरणासाठी बोलावण्यात आले असता ते उपस्थित राहिले नाहीत. यानंतर खासदार आष्टीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून, “शेतकऱ्यांचे नुकसान खपवून घेणार नाही, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा,” अशा सूचना दिल्या.


गुरुवारी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे पुन्हा निवेदन देऊन या तलाठ्याला तातडीने निलंबित करावे व या सज्जाचा पदभार दुसऱ्या तलाठ्यांकडे सोपवावा, अशी मागणी केली. तलाठी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत “पुढील अनुदान देखील कमी होईल” अशी धमकी देत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.


सदर तलाठी केशव थळंगे यांना यापूर्वी किनवट तालुक्यातील गैरव्यवहारांमुळे निलंबित करण्यात आले होते. त्या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या नावांऐवजी इतरांना अनुदान वितरित केले असल्याचे समोर आले होते. तरीही नंतर त्यांची हिमायतनगर येथे बदली झाली. बोरगडी सज्जाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वारस जमीनींच्या फेरफारासह विविध गैरप्रकार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी होत आहे.


