नांदेड / हिमायतनगर अनिल मादसवार| गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पाऊस आणि नद्यांच्या पुरामुळे हदगाव–हिमायतनगर तालुका जलमय झाला आहे. या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.


देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने पैनगंगा, कयाधू, कामारी-लाखाडी नद्या तसेच सर्व नाले तुडुंब भरून शेतात व घरांमध्ये पाणी शिरले. शेतकरी बांधवांचे गुरे-ढोरे, शेतीसाठी लागणारे साहित्य, सिंचन साधने पुरात वाहून गेले. शेतातील सर्व पिके नष्ट झाली असून, रस्ते वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. शहरातील दुकाने पाण्यात बुडाल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.


नदीकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी लाख रुपयांची मदत, तसेच गुरे-ढोरे व सिंचन साहित्याच्या नुकसानीसाठी तातडीची नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी हिमायतनगरचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व सामाजिक कार्यकर्ते रफिक सेट, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यवंशी सर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष माने, राजू झरेवाड, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष सदैव लढा देत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प रद्द करण्याची मागणी

याचवेळी सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या प्रकल्पामुळे परिसरातील शेती व गावांचा बळी जाणार असून, शेतकऱ्यांच्या मुलाबाळांचे भविष्य धोक्यात येईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
जवळगावकर यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पाची कोणतीही मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केलेली नाही. प्रकल्प जनभावनेच्या विरोधात असल्याने तो कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा. नदीला बारमाही पाणी राहावे यासाठी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यासाठी कालवा घोषित करावा. अशीही मागणी करण्यात आली, या प्रसंगी हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

