देगलूर l देगलूर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती उद्ध्वस्त, घरं कोसळली, जनावरे दगावली तरीही शासनाकडून ठोस मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांच्या रोषाला सोमवारी उधाण आले. काँग्रेस पक्षाच्या वतीने निघालेल्या विराट जनआक्रोश मोर्चाने शहरात संतप्त वातावरण निर्माण केले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. अण्णाभाऊ साठे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करत चौकातून मार्गक्रमण करत उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. ट्रॅक्टर, बैलगाड्या, शेकडोंच्या संख्येने शेतकरी व मजुरांचा सहभाग असल्याने संपूर्ण देगलूर शहरात दिवसभर उत्स्फूर्त वातावरण होते.

मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे पुढील ठोस मागण्या करण्यात आल्या- ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान दोन लाख रुपये भरपाई द्यावी, शेतमजुरांना तातडीने मदत पोहोचवावी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी व वीजबिल माफ करावे, देगलूर तालुक्याला पुरग्रस्त क्षेत्र घोषित करावे, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, किमान १८ तासांचा थ्री-फेज वीजपुरवठा द्यावा व नगरपालिकेतील व वीज वितरण कार्यालयातील गैरव्यवहारांची चौकशी करावी अशा अन्य मागण्यां करण्यात आल्या.


यावेळी बोलताना मोगलाजी शिरशेटवार यांनी शासनावर कठोर शब्दांत टीका केली. “शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचत नाही. शासन आंधळं-बधिर झालं आहे.

जर तत्काळ मदत जाहीर झाली नाही, तर अण्णाभाऊ साठे चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष शेख मिरामोहीयोद्दीन यांनी शेतकरी-मजुरांच्या न्यायासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषणाला सुरुवात केली आहे. “सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण सुरू राहील; आमचा लढा अखेरपर्यंत सुरू राहणार,” असे त्यांनी जाहीर केले.
मोर्चाच्या शेवटी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांना मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन संपन्न झाले. मात्र, सुरू झालेले अमर उपोषण आणि शेतकऱ्यांचा संताप लक्षात घेता, पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे…

