नांदेड, प्रतिनिधी | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट प्रवाशांविरोधात धडक मोहीम राबवत एका दिवसात १,०८७ जणांवर कारवाई केली. या कारवाईत ₹५,९८,३३५ इतका दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे रेल्वेने अवघ्या १५ तासांत २९ गाड्यांची तपासणी करून ही मोठी कारवाई केली.


दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाच्या निर्देशानुसार ३ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० ते सायंकाळी ७.३० या कालावधीत हजूर साहिब नांदेड–आदिलाबाद, नांदेड–परभणी–जालना–छत्रपती संभाजीनगर–मनमाड, परभणी–परळी वैजनाथ आणि पूर्णा–अकोला मार्गांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली.


कारवाईत ५१६ विनातिकीट प्रवासी, १५७ अनियमित प्रवासी आणि ४१४ बुक न केलेल्या सामानाची प्रकरणे आढळून आली. त्यातून अनुक्रमे ₹४.०४ लाख, ₹१.१७ लाख आणि ₹७६ हजार असा दंड वसूल करण्यात आला.



याशिवाय ५ अनधिकृत फेरीवाल्यांकडून ₹१० हजारांचा दंड, तर अस्वच्छता करणाऱ्या ४ जणांकडून ₹१,१०० दंड आकारण्यात आला. धूम्रपानाशी संबंधित कोणतेही उल्लंघन आढळले नाही. या मोहिमेत ३२ तिकीट तपासणी स्क्वॉड, १४९ तिकीट तपासनीस, १४ स्टेशन तपासणी कर्मचारी, ४ विभागीय वाणिज्य निरीक्षक आणि ३ आरपीएफ जवान सहभागी झाले होते.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावीत आणि रेल्वे नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी अशा धडक मोहिमा यापुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

