हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने थेट लढाईचा पवित्रा घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याच्या मागणीवरून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.


युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनावर आरोप करत सांगितले की, “फेब्रुवारी व मार्च महिन्यात उपोषण केल्यानंतर १५ एप्रिलपर्यंत जागा देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. ही सरळसरळ फसवणूक आहे असे मुन्नाभाऊ शिंदे यांनी म्हंटले आहे.”


२१ एप्रिलपासून उपोषण – या पार्श्वभूमीवर, २१ एप्रिल २०२६ पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.



प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न – शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे शिवप्रेमींत नाराजी वाढत असून, येत्या काही दिवसांत आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन या इशाऱ्याला कसा प्रतिसाद देते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.







