हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यात मागील काळात झालेल्या सततच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून राहिले असून, चिबाड जमिनीत पाणी न सुकल्याने कापूस पिकावर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर फवारण्या करूनही काहीच फरक पडत नाहीये, उलट कापसाची वाढ खुटली असून, पाने लालसर होत असल्याने लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.


या रोगामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. विशेषतः कमी क्षेत्रात शेती करणाऱ्या आणि नैसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक भयावह ठरत आहे.


अतिशय चिंतेची बाब म्हणजे, कृषी विभागाकडून स्थानिक स्तरावर कोणतेही योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पिकांना वाचवण्यासाठी कोणत्या प्रकारची कीडनाशके, बुरशीनाशके अथवा योग्य प्रक्रिया करावी, याबाबत अंधारात ठेवले जात असल्याने शेतकरी अन्नभिन्न झाले आहेत. त्यामुळं रान शिवारात असलेल्या काळजीवाहू वास्तवदर्शी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.


शेतकऱ्यांची मागणी
शेतकऱ्यांनी कृषी विभागाने त्वरित क्षेत्रभेट घेऊन योग्य त्या उपाययोजना व मार्गदर्शन द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच, लागण झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणीही जोर धरत आहे.
