मुंबई l हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या औषधांचे सेवन करून हत्तीरोगापासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.


आरोग्यभवन येथे आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस डॉ. नितीन अंबाडेकर सर संचालक, डॉ. बबिता कमलापूरकर मॅडम , सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग), डॉ. प्रेमचंद कांबळे सहायक संचालक, हत्तीरोग तसेच विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा संबंधित रुग्णांनी लाभ घ्यावा आणि आपल्या घरी, कार्यालयात किंवा शाळेत आरोग्य कर्मचार्यांमार्फत देण्यात येणारी औषधे सेवन करावे. त्यामुळे निश्चितपणे आपण हत्तीरोगावर मात करू शकतो. हत्तीरोगाने ग्रस्त रुग्णांना हत्तीपाय, अंडवृद्धी अशा व्याधीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे विविध समस्या उद्भवतात. आरोग्य विभागाला सर्वांनी सहकार्य करून हत्तीरोगापासून आपला बचाव करावा, असे ही मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा व चंद्रपुर या ५ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये १० फेब्रुवारीपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ५४ लाख ९८ हजार ८८४ लोकसंख्या असून, त्यापैकी ५१ लाख ५८ हजार १७० पात्र लाभार्थ्यांना औषध देण्याचे विभागाचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेंतर्गत उपचारासाठी डीईसी, अल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टिन या औषधी गोळ्या देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने या आजाराचे २०२७ पर्यंत आपल्या देशातून दुरीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे. मागील काळात राज्यातील १८ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यांतून हत्तीरोगाचे दुरीकरण करण्यात यश आले आहे…
