हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील दुधड-वाळकेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. दुषित पाणी पिण्यासाठी योग्य नसतांनाही नाईलाजास्तव पाणी प्यावे लागत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर बाबींकडे ग्राम पंचायत प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

हिमायतनगर तालुक्यातील दुधड, वाळकेवाडी, वडाची वाडी, रामनगर यासह अन्य खेडे गावे मिळून सर्वात मोठी तालुक्यातील गट ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना आरोग्य विभाग पाणी स्वच्छ व उकळून प्यावे, आरोग्यास हानीकारक पाणी पिऊ नये असे अवाहन करीत आहे. मात्र वाळकेवाडी येथे ग्रामपंचायतकडून अगदी गढूळ नाल्याचे पाणी पाईपलाईन नळाद्वारे सोडण्यात येत आहे. नाईलाजास्तव नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत असल्याने साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत प्रशासन मात्र या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


वाळकेवाडी गावाला होणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठेची विहीर नाल्यालगत असल्यामुळे नाल्याचे थेट पाणी वाळकेवाडी गावाला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीत जाऊन तेच नाल्याचे पाणी गावात नळाद्वारे गेल्या काही वर्षपासून येत असल्याची ओरड नागरिकांमधून सुरु आहे. या गंभीर बाबींकडे संबंधित विभागांच्या वरिष्ठांनी तात्काळ लक्ष पुरवून या ठिकाणी स्वच्छ व तसेच आरोग्यास हानी पोहचणार नाही. ही खबरदारी म्हणुन स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. अशी मागणी गावकरी नागरिकांतून पुढे आली आहे.


अनेक गंभीर आजार दूषित पाणी पिण्याने होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी ग्रामपंचायतीने एकप्रकारे खेळ सुरु केला असल्याच्या भावना गाववासियांमधून व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत प्रशासन रोगराईच्या काळात गाव स्वच्छ ठेवण्याऐवजी गावात दूषित पाणी पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शंकर बर्डे यांनी केला आहे.

