Thursday, May 14

बिडिओंच्या नावावर ‘नरेगा ‘ योजनेत गोंधळ ! उमरखेड पंचायत समितीतील प्रकार ! -NNL

उमरखेड, अरविंद ओझलवार। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या निगडीत असलेली नरेगा योजना उमरखेड तालुक्यात सर्वदूर राबविण्यात येत असून ही योजना मात्र अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी अर्थपूर्ण योजना ठरत आहे .पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या या योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क बिडीओ यांच्या नावावर नरेगातील कर्मचारी पैसे उकळत असल्याचे दिसून येत आहे .

गुरांचा गोठा , सिंचन विहीर वैयक्तिक, मोहगुनी वृक्ष लागवड ,बिहार पॅटर्न वृक्षलागवड ,नाली बांधकाम, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड , स्मशानभूमी वृक्ष लागवड , पांदण रस्ते तयार करणे , शोषखड्डे ,गांडूळ खत निर्मिती , कुक्कुटपालन शेड , शेळी पालन शेड,रोपवाटिका ,फळबाग , मच्छी तलाव यासह विविध हेडवर पंचायत समिती मार्फत कामे सुरू असून येथील गट सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (एपिओ )तांत्रिक अधिकारी ( पीटिओ )डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी मात्र या योजनेमध्ये गोंधळ निर्माण करून ठेवला आहे .ग्रामपंचायत रोजगार सेवकाकडून गावातील गरजू लाभार्थ्यांची पंचायत समिती येथे फाईल टाकण्यात येते मात्र त्या फाईलीसाठी त्यांना पैसे मोजावे लागत आहे . या योजनेमध्ये काम करणारे सर्वच कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे पैसा द्यावा लागतो .नरेगा अंतर्गत 93 ग्रामपंचायत मध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामे सुरू आहेत . प्रत्येक गावांमध्ये अंदाजे 25 लाख रुपयापासून तर काही गावांमध्ये करोडो रुपयाचे कामे सुरू आहेत .

पंचवीस लाख रुपयाचे काम सुरू आहेत त्या गावातील रोजगार सेवकांना , लाभार्थ्याना पंचायत समितीला येऊन दररोज चकरा माराव्या लागतात याउलट निंगणुर , कृष्णापुर , ब्राम्हणगाव ,टेंभुरदरा, भवानी , विडुळ, जेवली , अमडापूर या गावांमध्ये करोड रुपयाचे काम सुरू आहेत मात्र त्या ठिकाणचा एकही व्यक्ती किंवा रोजगार सेवक चकरा मारताना दिसून पडत नाही याचे कारण म्हणजे नरेगा कार्यक्रम राबविणारे अधिकारी कर्मचारी यांची अगोदरच मिली भगत झालेली असल्याचा आरोप ही काही रोजगार सेवकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला आहे .अधिकारी यांनी रोजगार सेवकामार्फत आलेल्या फाईल घेणे बंधनकारक असताना नरेगाच्या कर्मचाऱ्याकडून सरळ लाभार्थ्यांना भेटून त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांच्या फाईली पूर्णत्वास जातात .

नरेगाच्या कर्मचाऱ्यांनी विहीर ठेकेदार ,काही सरपंच,उपसरपंच, माजी सरपंच यांच्याशी संपर्क साधलेला असून करोडो रुपयांच्या कामांमध्ये कामेकशी होत आहेत याकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही .नरेगा योजनेतील या कामांमध्ये 6323 मजूर तर इतर यंत्रणेतील425 मजूर असे मिळून 6748 मजुरांची तालुक्यातील 93 ग्रामपंचायत मध्ये होत असल्या कामावर पटसंख्या दाखविण्यात आली आहे .नरेगा योजनेतील कामांमध्ये ही मजुरांची उपस्थिती सुद्धा कागदावरच दाखविण्यात आल्याचा संशय या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे .पंचायत समितीमध्ये नरेगा योजनेमध्ये जवळपास 15 कर्मचारी काम हाताळत असून काही काही कर्मचाऱ्यांना एकाच टेबलवर 12 ते 13 वर्ष झाले असल्याचे देखील माहिती मिळाली आहे .

पंचायत समिती माध्यमातून नरेगा योजना राबविण्यात येत असून त्यासोबतच वनविभाग , कृषी विभाग , सा .बां . विभाग , जिल्हा परिषद विभाग , सामाजिक वनीकरण या कार्यालयातून देखील या योजनेअंतर्गत विविध कामे तालुक्यात करण्यात येत आहेत .एकंदरीत शेतकऱ्यांच्या निगडित असलेल्या या योजनेमध्ये शेतकऱ्यांना, लाभार्थ्यांना नाहक त्रास होऊ नये अशी सूचना राज्य सरकारकडून असून देखील ही या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्गाकडून भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा आरोपही चक्क काही रोजगार सेवकांनीच ‘दिव्य मराठी ‘शी बोलताना केला आहे .

नरेगा योजनेतीलच नाहीतर पंचायत समिती कार्यालयाच्या कोणत्याही विभागातील अधिकारी कर्मचारी हे लाभार्थ्यांना पैसे मागत असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन नागरिकांना आहे .अशा तक्रारी यापूर्वीही आल्याने पंचायत समिती कार्यालया बाहेर फलकही लावण्यात आलेला आहे .त्यामुळे लाभार्थ्यांनी शेतकऱ्यांनी अडचण आल्यास संपर्क साधावा . प्रवीणकुमार वानखेडे, गट विकास अधिकारी पं .स . उमरखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!