नांदेड| सध्याच्या पावसामुळे आणि त्यानंतरच्या दमट वातावरणामुळे किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता, नांदेड जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि इतर कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग कटीबद्ध आहे.


आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना
जनजागृती अभियान : आरोग्य सेवक, आरोग्य सेविका घरोघरी जाऊन नागरिकांना या आजारांची माहिती देतील आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना समजावून सांगतील.
डास उत्पत्ती स्थानांचा शोध व निर्मूलन : साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे घरातील आणि घराबाहेरील कुंड्या, टायर, नारळाच्या करवंट्या, पाण्याच्या टाक्या इत्यादी ठिकाणी पाणी साचू न देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका डास उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करतील.

फवारणी मोहीम :- आवश्यकतेनुसार डासांचा प्रादुर्भाव असलेल्या परिसरात फवारणी केली जाईल.
ताप रुग्ण सर्वेक्षण :- आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका व आशा सेविका घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांचा शोध घेतील आणि त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला व उपचार मिळवून देण्यास मदत करतील.
तात्काळ उपचार :- ताप आल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा डॉक्टरांकडे जाऊन रक्त तपासणी करावी आणि उपचार घ्यावा. स्व-औषधोपचार टाळावा.


नागरिकांना आवाहन:
नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे आणि आपल्या परिसरात स्वच्छता राखावी. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळून पाण्याची भांडी, घासून, पुसून, कोरडी करून रिकामी करावीत. खिडक्यांना जाळ्या लावाव्यात आणि झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. कोणताही ताप किंवा आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्वरित उपकेंद्र व प्रा.आ. केंद्र अशा शासकीय संस्थांशी संपर्क साधावा असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. अमृत चव्हाण यांनी केले.


