
नांदेड| नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना द्यावेत आणि शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


खासदार डॉ. गोपछडे यांनी निवेदनात नमूद केले आहे की. नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. नांदेड जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून पुराचे पाणी शेतात घुसल्यामुळे शेतीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या पडणार्या पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी साचले आहे. शेतकर्यांचे नगदी पीक असलेले मुग काढणीला आले असताना ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकर्यावर ही नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे पार खचून गेला आहे.

अतिवृष्टीमुळे बहुतांश पिके धोक्यात आली आहेत. नदीकाठच्या सखल भागात पाणी साचल्यामुळे नुकसान झालेल्या शेतजमिनींचे व पिकांचे पंचनामे तात्काळ करणे गरजेचे आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळावी यासाठी महसूल विभागामार्फत नुकसना झालेल्या नांदेड जिल्ह्यातील पिकांचे व शेतजमीनींचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, नांदेड यांना त्वरीत द्यावेत, अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी या निवेदनात केली आहे. जिल्हाधिकार्यांची भेट दरम्यान खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन त्यांना शेतीचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.





