हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील बरडशेवाळा येथील दुर्गा बालाजी गाढवे हिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण समाजाच्या सामूहिक पुढाकारामुळे अविस्मरणीय ठरला. वडिलांचे छत्र पंधरा वर्षांपूर्वी हरपल्यानंतर आई वनाबाई यांनी रोजमजुरी करत दुर्गा व लहान भाऊ सुनील यांचे संगोपन केले. मात्र विवाह तोंडावर असताना वाढती महागाई आणि खर्चाचा डोंगर पाहता कुटुंब अडचणीत सापडले होते.

ही बाब समाजोपयोगी कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आधार प्रतिष्ठान – नाते माणुसकीचे ग्रुपच्या निदर्शनास आली आणि काही तासांतच मदतीचा हात पुढे आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्ती राव वानखेडे मानवाडीकर, सचिव गजानन अनंतवार कवानकर, सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे पळसेकर, प्रभाकर दहिभाते आदींनी कन्यादान, अन्नदान तसेच विवाहासाठी लागणारे साहित्य, गादी-पलंग, टेंट, आचारी, बॅण्ड आदी सर्व बाबींसाठी सोशल मीडियावर आवाहन केले.

विशेष म्हणजे अवघ्या तीन तासांत आवश्यक निधी व साहित्याची व्यवस्था पूर्ण झाली. अनेक दानशूर व्यक्तींनी प्रत्यक्ष व गुप्त स्वरूपात मदत करत माणुसकीची परंपरा जपली.


गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी सर्व साहित्य वधूमंडपात उपलब्ध करून देण्यात आले. समाजाच्या सहकार्यामुळे दुर्गाचा विवाह सोहळा आनंदात, समाधानात आणि आत्मीयतेने पार पडला. या उपक्रमामुळे सोशल मीडियाचा सकारात्मक वापर किती प्रभावी ठरू शकतो, याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे.


उपस्थित मान्यवर व नागरिकांनी या कार्याचे कौतुक करत, “नाते रक्ताचेच असावे असे नाही, माणुसकीचेही असते,” अशी भावना व्यक्त केली. ही घटना केवळ एका विवाहाची नाही, तर समाज एकत्र आला तर कोणतीही अडचण मोठी राहत नाही, याची प्रेरणादायी कहाणी आहे.

