Dhadak Morcha of Situ | सीटूचा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर धडकला -NNL

नांदेड। दि.१० जुलै रोजी सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या नेतृत्वाखाली म.गांधी पुतळा येथून दुपारी एक वाजता धडक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आणि जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. गगनभेदी घोषणा देत राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मोर्चात आशा आणि गटप्रवर्तक ताई मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या.


राष्ट्रीय मागणी दिना निमित्ताने देशव्यापी मोर्चाची हाक सीटू कामगार संघटनेने दिली होती. सदरील मोर्चात खालील मागण्या करण्यात आल्या. आशा व गटप्रवर्तकांना किमान, कर्मचारी दर्जा व पेन्शन देण्यात यावे. गटप्रवर्तकांचे समायोजन करण्यात यावे. आशा व गटप्रवर्तक ताईंनी लोकसभा निवडणुकीत वरिष्ठाच्या आदेशानुसार कर्तव्य पार पाडले आहे परंतु बहुतांश कार्य केलेल्या ताईंना अद्याप निवडणूक भत्ता देण्यात आला नाही तो तात्काळ देण्यात यावा. राज्य सरकारने घोषित केलेले वाढीव मानधन तात्काळ देण्यात यावे. जिल्हा परिषदेणे दिवाळी बोनस पाच हजार रुपये द्यावे.मागील सर्व थकीत मानधन व बील देण्यात यावे. गटप्रवर्तकांना घोषित केलेली दहा हजार वाढ देण्यात यावी.

नैसर्गिक आपत्तीचे जुलै २०२३ मधील पूरग्रस्तांचे मंजूर अनुदान तात्काळ वाटप करावे. मुंबई मंत्रालय येथील मदत व पुनर्वसन विभागाचे सह सचिव संजय कुडवे यांना लेखी कळवून लेखाशीर्ष सुरु करून मागील सहा महिन्यापासून सुरु असलेले सीटू कामगार संघटनेचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी यांनी सोडवावे. मौजे वझरा शेख फरीद ता.माहूर येथील ग्रामसभा ठरावानुसार व पेसा कायद्यानुसार सूचित केलेली जमीन अधिग्रहण करावी व २५० प्लॉट्स पाडून द्यावेत.


आदी मागण्याचे निवेदने जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि संबंधित आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड यांना देण्यात आले. महापालिका मुख्य प्रवेश द्वारा समोर हजारो मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत मनपाच्या घोटाळ्याचा पाढाच वाचला. या मोर्चाचे नेतृत्व फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार आणि सचिव कॉ गंगाधर गायकवाड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु असलेल्या प्रा.रामचंद्र भरांडे सरांच्या उपोषणास पाठिंबा देत शिष्टमंडळाने उपोषणार्थीची भेट घेऊन चर्चा केली. जिल्हा परिषदेत सभा घेऊन निवेदन दिले आणि समारोप करण्यात आला.

कॉ.उज्वला पडलवार यांनी जिल्हा प्रशासन तसेच राज्य आणि केंद्र सरकावर सडकून टीका केली. अ.भा.किसान सभेचे नेते कॉ.शंकर सिडाम यांनी पाठिंबा दिला. ते म्हणाले की,शेतकरी देखील कामगारांच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरतील आणि प्रशासनास धारेवर धरतील. मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉ.शिलाताई ठाकूर,कॉ.वर्षा सांगडे, कॉ.सारजा कदम, कॉ. सुनीता पाटील, कॉ. जयश्री मोरे कॉ.करवंदा गायकवाड, कॉ. लता गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ.जयराज गायकवाड, कॉ. मारोती केंद्रे, कॉ.मंगेश वट्टेवाड, कॉ. स.ना.राठोड आदींनी परिश्रम घेतले.



