मुंबई | शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, सैनिकी शाळा, शासकीय विद्यानिकेतन आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.


मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री भुसे यांनी शिक्षकांची रिक्त पदे, शाळांमधील सोयी-सुविधा, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची स्थिती, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, मूल्यमापन प्रक्रिया तसेच विविध योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित संस्थांचे प्राचार्य उपस्थित होते.


बैठकीत शिक्षक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. तसेच शाळांच्या इमारतींची स्थिती, मंजूर निधीचा वापर, खर्च व शिल्लक निधीची माहितीही तपासण्यात आली.




मंत्री भुसे यांनी ज्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय विद्यालये नाहीत तेथे नवीन शाळांसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच सैनिकी शाळांतील विद्यार्थ्यांकडून परिसरातील इतर शाळांमध्ये प्राथमिक प्रशिक्षण उपक्रम राबविणे आणि शासकीय विद्यानिकेतनांमधील विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय शाळांमधील पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामे वेळेत पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे तसेच शासनाच्या शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

