नांदेड| अंगणवाडी केंद्रे केवळ पोषण आहार वाटपापुरती मर्यादित न राहता बालकांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासाचे केंद्र बनावीत. यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.


नांदेड शहरातील अंगणवाडी केंद्रांच्या संदर्भात जिल्हा बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्याध्यापकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके, महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी प्रवीण मांदळे आणि जिल्हा समुपदेशक तथा शिक्षण विस्तार अधिकारी बालासाहेब कच्छवे उपस्थित होते.


जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अंगणवाडी केंद्रांना प्राथमिक शाळांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. बालकांचा बौद्धिक व शैक्षणिक विकास साधण्यासाठी शाळा आणि अंगणवाडी यांच्यात समन्वय वाढविणे आवश्यक आहे.




