पेनूर| समता, बंधूभाव आणि समाजसुधारणेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजही समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत शालेय समिती सदस्य तथा पत्रकार विरभद्र एजगे यांनी व्यक्त केले.


महात्मा बसवेश्वर हे १२व्या शतकातील महान भारतीय तत्त्ववेत्ता, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक होते. त्यांनी स्त्री-पुरुष समानता, लोकशाही मूल्ये आणि जातिभेद निर्मूलनासाठी मोठे कार्य केले. ‘काय कायकैवे कैलास’ (काम हीच पूजा) हा त्यांचा संदेश समाजाला दिशा देणारा ठरला. तसेच ‘अनुभव मंडप’ स्थापनेद्वारे त्यांनी समाजात विचारमंथनाची परंपरा निर्माण केली.


जिल्हा परिषद हायस्कूल, पेनूर येथे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक बसूआप्पा धोंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सचिन तात्या धोंडे, माधव पाटील गवते, विलासआप्पा कंधारकर, शिवहार गोवखंडे, राजूआप्पा आराळे, दीपक धोंडे, बबलू आराळे, मन्मथ धोंडे, संग्राम आप्पा सुकणे, राजूआप्पा कंधारकर, नागनाथ आराळे उपस्थित होते. प्रमुख व्याख्याते म्हणून सहशिक्षक रामलिंग नागठाणे यांनी मार्गदर्शन केले.




कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. प्रमुख व्याख्याते रामलिंग नागठाणे यांनी सखोल मार्गदर्शन केले, तर मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांनीही आपल्या मनोगतातून बसवेश्वर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक, गावकरी तसेच शालेय समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाराम राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन माधव पवार यांनी मानले.







