
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हिमायतनगर तालुक्यातील मौजे कारला येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात शिवपुराण कथेमधून समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश देताना ह.भ.प. बालयोगीणी मुक्ताई महेश्वरी नाथ यांनी स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक जीवनावर मार्मिक विचार मांडले. त्या म्हणाल्या की, “जन्माला आलेली मुलगी दोन कुळांचा उद्धार करते, तर मुलगा एका कुळाचा उद्धार करतो. मात्र तो मुलगा संस्कारित असेल तरच पिढ्यांचा उद्धार होतो; अन्यथा व्यसनाधीनतेमुळे संपूर्ण कुटुंबाचे नुकसान होते. त्यामुळे मुलीच्या जन्माचे स्वागत करणे आवश्यक आहे.”


या सप्ताहात आयोजित भव्य शिवपुराण कथेमध्ये तिसऱ्या दिवशी माता सतीचा यज्ञ आणि भगवान शिवांची विरक्ती या प्रसंगावर त्यांनी प्रभावी कथन केले. राजा दक्षाने यज्ञात भगवान शिवांचा अपमान केल्यामुळे सतीने यज्ञाग्नीत देहत्याग केल्याची कथा सांगताना त्यांनी वैवाहिक जीवनातील आदर, समजूतदारपणा आणि एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले.

त्या पुढे म्हणाल्या, “पती-पत्नीचे शरीर वेगळे असले तरी आत्मा एकच असतो. नात्यातील आदर कायम ठेवणे गरजेचे आहे. कलह वाढू देऊ नये, तर समजूतदारपणाने संसार सांभाळावा. प्रत्येक स्त्रीने पतीचा सन्मान राखत घरातील मोठ्यांचा मान ठेवला तरच कुटुंब परंपरा टिकून राहते आणि जीवन सार्थ होते.” वैवाहिक जीवनात संयम, त्याग आणि प्रेम या मूल्यांचे महत्त्व पटवून देताना त्यांनी सांगितले की, “सुखी संसारासाठी कुटुंबातील मर्यादा, संस्कार आणि परंपरा जपणे अत्यंत गरजेचे आहे. मुलींना चांगले संस्कार दिल्यास समाज अधिक सुदृढ बनेल.” आणि कुटुंबव्यवस्थेचे जतन होण्यासाठी मदत मिळते.


या शिवपुराण कथेला मृदंगाचार्य कृष्णा बोंपीलवार, उदय जाधव तसेच गायिका मिराताई जाधव यांची साथ लाभत आहे. दररोज मोठ्या संख्येने महिला व पुरुष भाविक उपस्थित राहून कथेमधील अध्यात्मिक संदेशाचा लाभ घेत आहेत. एकूणच, कारला येथे सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह व शिवपुराण कथेमुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, समाजाला संस्कार, आदर आणि कुटुंबमूल्यांचा संदेश मिळत आहे.



