नांदेड | श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराजांचे साहिबजादे यांनी देश व मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या अतुलनीय बलिदानाची स्मृती जपण्यासाठी आणि भावी पिढीमध्ये मानवता व राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्यासाठी दरवर्षी गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या वतीने माननीय पंजप्यारे साहिबान यांच्या सरप्रस्तीत 25 व 26 डिसेंबर रोजी “साहिबजादे शहादत दिवस” समागमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही हे कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरे करण्यात आले.


दि. 25 डिसेंबर 2025 रोजी रात्री विशेष कीर्तन दरबार व सद्भावना दौड (मॅरेथॉन) आयोजित करण्यात आली. तसेच दि. 26 डिसेंबर 2025 रोजी शाळकरी विद्यार्थ्यांची सद्भावना रॅली, दशमेश हॉस्पिटलमध्ये विविध वैद्यकीय शिबिरे आणि श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन येथे डॉ. स. विजय सतबीर सिंघ, IAS (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली सद्भावना सम्मेलन पार पडले.


दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता अरदास, विद्यार्थ्यांकडून शब्दगायन, साहिबजाद्यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य स. गुरुबचन सिंघ यांनी मांडली व साहिबजाद्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी ग्यानी तनवीर सिंघ, प्रो. डॉ. परमिंदर कौर (कोल्हापूर), ग्यानी सरबजीत सिंघ जी निर्मले, प्रो. डॉ. प्रकाश निहलानी व ग्यानी अवतार सिंघ जी शीतल यांनी मनोगत व्यक्त करून साहिबजाद्यांच्या शहादतीचा इतिहास उपस्थितांसमोर उलगडला.


अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय सतबीर सिंघ यांनी 7 व 9 वर्षांच्या साहिबजाद्यांनी मानवतेच्या रक्षणासाठी आणि अन्यायकारक सत्तेच्या दबावाला न जुमानता धर्मांतरास नकार देत दिलेल्या बलिदानाचा उल्लेख केला. हे बलिदान कोणत्याही धर्माविरुद्ध नसून केवळ मानवता, तत्वनिष्ठा व राष्ट्ररक्षणासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भावी पिढीने या बलिदानातून प्रेरणा घेऊन मानवता, देश व तत्वांसाठी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने आयोजित मॅरेथॉन व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व सन्मान राशीची पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच साहिबजाद्यांच्या स्मरणार्थ बोर्डातर्फे प्रकाशित “सचखंड पत्र” या विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमास स. हरजीत सिंघ कडेवाले (अधिक्षक), स. जसवंत सिंघ बॉबी (सल्लागार), स. रविंदर सिंघ कपूर, स. जैमल सिंघ ढिल्लो, स. बलविंदर सिंघ फौजी (सहाय्यक अधिक्षक), स. गुरुवचन सिंघ (प्राचार्य), स. चांद सिंघ (मुख्याध्यापक), श्रीमती अनिल कौर (प्राचार्य), श्रीमती बबीता कौर चाहेल (पी.ए.) आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स. भिम सिंघ बेलथरवाले (निदेशक) यांनी केले तर आभार स. सतपाल सिंघ मास्टर (खालसा हायस्कूल) यांनी मानले.

