नांदेड| भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त पीपल्स कॉलेज, नांदेड येथे संविधान दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रमांनंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना अर्पण केली होती. या ऐतिहासिक घटनेला आज ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत.


कार्यक्रमाची सुरुवात प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांच्या हस्ते राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे पूजन करण्यात आले व सर्व उपस्थितांनी सामूहिकरित्या संविधान उद्देशिकेचे वाचन केले.

या निमित्ताने “भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये” या विषयावर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अभय दातार यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या भाषणात डॉ. दातार यांनी भारतीय राज्यघटनेतील मूलभूत तत्वे, तिची वैशिष्ट्ये तसेच इतर देशांच्या राज्यघटनांशी तुलना करत भारतीय राज्यघटनेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “भारतीय राज्यघटना ही सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन असून जगातील सर्वश्रेष्ठ घटनांपैकी एक आहे.”



कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. अशोक सिद्धेवाड, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य प्रा. विलास वडजे, इंग्रजी विभागातील प्रा.आनंदा थोरात, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. स्वाती काटे, प्रा. सविता महाजन, ग्रंथपाल प्रा. संदीप गायकवाड उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. विजय कदम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी केले.


