हिमायतनगर| शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मागील महिनाभर नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे नाल्या तुंबल्या असून, गटाराचे पाणी थेट रस्त्यावर वाहू लागले आहे. तात्काळ या घाण पाण्याचा बंदोबस्त करा अन्यथा गटाराचे पाणी नगरपंचायतीत टाकू असा कडक इशारा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वामनराव पाटील यांनी दिला आहे.


विशेष म्हणजे, हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरच दुर्गंधीयुक्त गटारगंगेचे पाणी वाहत असल्याने व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वाईट परिस्थितीत जीवन जगत आहेत.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) चे कार्यकर्ते वामनराव पाटील मिराशे वडगावकर यांनी नगरपंचायतीला कडक इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, “तात्काळ राष्ट्रीय महामार्गासह शहरातील गल्लोगल्ली वाहणारे गटाराचे पाणी थांबवून नागरिकांना साथीच्या आजारापासून सुरक्षा द्यावी, अन्यथा हेच दुर्गंधीयुक्त गटारपाणी नगरपंचायतीत आणून टाकण्यात येईल.”



शहरातील अस्वच्छतेमुळे वाढणारा डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधी ही परिस्थिती आणखी भयावह होऊ नये यासाठी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. हि बाब लक्षात घेता नगरपंचायत प्रशासनाने तातडीने शहरातील रस्त्यावर येणाऱ्या गटारीच्या पाण्याचा योग्य बंदोबस्त करून नागरिकांना साथीच्या आजारच धोका होणार नाही यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.


