नायगाव| मांजरम येथील पाझर तलाव दि.२८ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता फुटला आणि हजारो एकर जमीन अक्षरशः पाण्याखाली आली व लगतची पिके वाहून जातानाच शेतजमिनही खरडली. निकृष्ट तसेच अतांत्रिक पद्धतीने पाझर तलावाचे काम केल्यामुळेच मांजरमचा पाझर तलाव फुटला असल्याचा आरोप पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केला आहे.


मांजरम येथे सकाळपासूनच ढगफुटीमुळे संपूर्ण शेतशिवार पाण्याखाली गेले होते. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पाण्याखाली गेले होते आणि त्यात पाझर तलाव फुटला यामुळे संपूर्ण शेत शिवार रात्रभर पाण्याखाली राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांचे तुषार संच, ठिबक संच,पशूचारा इत्यादी शेती उपयुक्त साहित्य वाहून गेले.तर,अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी सुद्धा खचल्या आहेत.

फुटलेल्या पाझर तलावाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (श. प) नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केली . येथील स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आलं की, तलावाच्या पाळूची रुंदी अनावश्यक पद्धतीने वाढवली तसेच उंची कमी केल्यामुळे आणि अतांत्रिक पद्धतीने थातूरमातूर काम केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे.



याबाबत सदरचे काम सुरु असतांनाच सन् २०२२ मध्ये मी स्वतः संबंधित विभागाकडे तक्रार दिली होती.माध्यमांनीही दखल घेतली होती. परंतू, स्थानिक लोकप्रतिनिधींसह त्यांचे हितचिंतक कंत्राटदार व संबंधित विभागाकडून याप्रकरणात दूर्लक्ष झाले. त्यामूळेच सदरची हानी झाली आहे.याला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर गुन्हे दाखल करावे आणि नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी. यावेळी फुटलेल्या तलावाच्या पाहणीवेळी स्थानिक तलाठी श्री.नंदकिशोर अनपवाड व अनेक शेतकरी उपस्थित होते.


