किनवट, परमेश्वर पेशवे| कोसमेट येथील शिवरा मधील शेतात कोळपणी करीत असताना लोखंडी विद्युत पोल मध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने औतास चालत असलेल्या बैलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 16 जुलै रोजी 11:40 च्या सुमारास घडली.

कोसमेट येथील अल्पभूधारक शेतकरी आनंद साखरे यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची कोळपणी करण्यासाठी शेजारचे शेतकरी बालाजी शेषराव वाघमारे यांचे बैल कोळपणीसाठी आणले होते. सदरील शेतामध्ये सोयाबीनची कोळपणी सुदाम अक्कमवाड ,दिगंबर मॅकलवाड संदीप मॅकलवाड ,नरसंना करसपेवाड ही शेतमजूर करत होती.


सदरील कोळपणीचे औत पलटवत असताना विद्युत पोलच्या अर्थीन तारेला बैलांच्या शरीराचा स्पर्श झाला व बैल जागीच जमिनीवर कोसळला. व बैलांनी जागीच जीव सोडला असल्याची माहिती. बालाजी वाघमारे यांनी महावितरण कंपनीस व पोलीस स्टेशन इस्लापूर यांना कळवली असता इस्लापूर येथील महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कांगणे व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला.


पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के व गिरे यांनी सदरील बैलाचे शवविच्छेदन केले. परिसरातील शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत लाईनचे तारे लोंबकळत असून यापासून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने विद्युत वितरण कंपनीने इस्लापूर भागातील सर्वच गावातील शेतीमधील लोंब कळणारी विद्युत तारे व त्याच्यापासून होणारा धोका उद्भभवू नये यासाठी पावले उचलावीत अशा स्वरूपाची मागणी जनसामान्यातून होत आहे. सदरील बैलांचा मृत्यू हा महावितरणच्या बेजबाबदार पणामुळे घडला असल्याची ओरड सुद्धा शेतकऱ्याकडून ऐकायला मिळत होती. ऐन पावसाळ्या त शेतकऱ्याचा बैल मरण पावल्याने शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.


