by NNL Team
Post Views : 549
हिमायतनगर, अनिल मादसवार। हिमायतनगर शहर व तालुका परिसरात मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन जोरदार अवकाळी पाऊस झाला, या अवकाळी पावसामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. तर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना काहींसा दिलासा मिळाला होता.
गेल्या आठ दिवसापासून नांदेड जिल्ह्याचा हिमायतनगर तालुका परिसरात उष्णतेने उच्चांक काढला असून, उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. प्रशासनाने नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दिनांक 8 एप्रिल रोजी सायंकाळी 4 . 30 च्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांची एकचं धावपळ उडाली होती, तर शेतीत वादळामुळे हळदीसह वैरनाचं मोठं नुकसान झालं आहे. आजच्या वादळी पावसाने उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.

तर आंब्याच्या झाडाला लगडलेली आंबे, टरबूज, चिकूसह ईतर फळबागांचे व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेतात साठवून ठेवलेलं इंधन परहट्या व वैरण उडून गेली, तर शेतीत असलेल्या हळद, तीळ, भुईमूग, सूर्यफूल,उन्हाळी ज्वारी, आदी पिकांचे नुकसान झाले तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर काही ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली असून, ग्रामीण भागातील काही गावातील नागरिकांच्या घरांसह झोपड्या वरील टिनपत्रे उडून गेल्याने संसारउपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे.एकूणच वादळी वारे पावसामुळे ग्रामीण भागातील व हिमायतनगर शहरातील वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.
एकूणच आज झालेल्या वादळी वारे, विजांचा कडकडाटात अवकाळी पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना हैराण करून सोडले होते यामुळे शेतकरी नागरिकांची एकच धावपळ उडाली असल्याचे पहावयास मिळाले आहे.
