नांदेड| गणित हे केवळ शालेय स्तरावरच नाही, तर आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे. त्याच्यामुळेच जगातील अत्याधुनिक शोध व तंत्रज्ञानाचा विकास झाला आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गणिताच्या विविध महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपली संशोधन क्षमता वृद्धींगत करावी, असे मत विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के.पाटील (Mathematics is essential in every field of modern science and technology-Dr.M.K. Patil) यांनी व्यक्त केले.


ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्रे संकुलामध्ये ‘अल्झेब्रा आणि कोडींग थेरी’ आणि ‘डिफ्रेशियल इक़्वेशन आणि डायनामिक सिस्टम’ या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरांवरील कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत विद्यापीठाचे कुलसचिव तथा संकुलाचे संचालक आणि कार्यशाळेचे आयोजक डॉ. डी.डी. पवार, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, पीएम-उषा समन्वयक डॉ. टी.ए. कदम, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, डॉ.व्ही.लोकेशा, डॉ. एस.डी. केंद्रे, डॉ. सचिन भालेकर, डॉ. के.डी. कुच्चे, डॉ. गणेश कडू, डॉ. संध्या जैन यांची उपस्थिती होती.

पुढे डॉ. पाटील म्हणाले, आजच्या काळात गणिती तत्त्वांचा वापर करूनच आपण नवे शोध, तंत्रज्ञान आणि आविष्कार निर्माण करू शकतो. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. जे गणिताच्या तत्त्वांवर आधारित आहे. या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा गाभा समजून भविष्यात त्यामध्ये संशोधन करण्याची प्रेरणा मिळणार आहे.


विद्यापीठाचे कुलसचिव तथा गणितीयशास्त्रे संकुलाचे संचालक आणि कार्यशाळेचे आयोजक डॉ. डी. डी. पवार अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की, या कार्यशाळेतून मिळणाऱ्या ज्ञानाद्वारे उपस्थितांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत कराव्यात, या कार्यशाळेचे आयोजन गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवसंशोधनाला चालना देण्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेवून भविष्यात तज्ञ व संशोधक म्हणून समाजाचा विकास साधता येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन दारकुंडे यानी केले तर डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी संकुलविषयी परिचय देत संकुलातील विविध उपक्रमा विषयी माहिती दिली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रुपाली जैन यांनी आभार व्यक्त केले.




