नांदेड| जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी बियाणे व खते खरेदी करते वेळेस अधिकृत परवाना धारकांकडून पक्की पावती घेऊनच खरेदी करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी अनाधिकृत बियाणे व खत विक्रेते गावो-गावी फिरुन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्याची अमिष दाखवून बियाणे व खते विक्री करु शकतात. अशा प्रकारचे अनाधिकृत बियाणे व खते विक्रेते गावात फिरून विक्री करत असल्यास संबंधीत तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती व जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क, साधावा असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


परिवहन विभागाच्या 115 अधिसूचित सेवा
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत परिवहन विभागाच्या एकूण 115 अधिसूचित सेवा असून त्यापैकी 85 ऑनलाईन व 30 ऑफलाईन सेवा आहेत. राज्यातील नागरिकांना राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक व कालबद्ध पद्धतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात संबंधित माहिती व देण्यात येणाऱ्या सेवांचा डिजिटल फलक प्रदर्शित करण्यात आला आहे. अनुज्ञप्ती संबंधीच्या सेवा सारथी पोर्टलवर वाहन संबंधी सेवा वाहन पोर्टलवरून पुरविण्यात येतात. काही सेवा आधारबेस फेसलेस स्वरूपात दिल्या जात आहेत. जिल्ह्यातील सर्व वाहन-चालक व वाहनधारकांनी परिवहन विभागातील कामकाजासंबंधी नोंद घेऊन या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 एप्रिल चे 6 वाजेपासून ते 19 मे 2025 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन वादग्रस्त जागा, ज्याची चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 मे 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरले आहेत अशा विद्यार्थ्यांचे नुतनीकरण अर्ज ऑनलाईन पद्धतीने तपासणी झाली आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण कागदपत्राअभावी त्रुटीत आले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देण्यात येत आहे. ही शेवटची संधी असून अर्ज त्रुटीत आलेल्या विद्यार्थ्यांनी http://www.syn.mahasamajkalyan.in संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या अर्जातील त्रुटीची पूर्तता एसएमस प्राप्त झाल्याच्या 28 एप्रिल 2025 या कालावधीत कार्यालयास सादर करावयाची आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.
संकेतस्थळ :- http://www.syn.mahasamajkalyan.in ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटित आले आहेत अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीवर ज्या कागदपत्रांची पुर्तता केली आहे, त्याची प्रत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन ग्यानमाता शाळेसमोर नमस्कार चौक नांदेड येथे समक्ष सादर करावा. दिलेल्या मुदतीनंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहेत.