किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील पैनगंगा नदी काटच्या 25 गावात पाणीटंचाईने रौद्र स्वरूप धारण केले असून पैनगंगा नदीमध्ये ईसापुर धरणाचे पाणी सोडण्यासाठी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम व हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबूरावजी कोहळीकर यांनी पावले उचलावी अशा स्वरूपाची आता या दोन्ही मतदारसंघातून मागणी पुढे येत आहे. उमरखेडचे आमदार किसनराव वानखेडे यांनी एसडीओंच्या दालनात तातडीची बैठक उमरखेड येथे घेऊन तालुक्यातील पाणीटंचाई संदर्भात पैनगंगा नदी पात्रात पाणी नसल्याने नदी काठावरील गावांचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटिल बनत चालला आहे .याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेण्यासाठी पाऊले उचलावीत अशा स्वरूपाच्या सक्त सूचना दिनांक 21 रोजी उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत दिल्या.


मागील काही दिवसांपासून पैनगंगा नदी पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले आहे मात्र अद्यापपर्यंत पाणी टेलपर्यंत पोहचले नसल्याने अन्य गावात पाणी टंचाई सदृश स्थिती निर्माण झाली आहे . याबाबत नांदेड जिल्हाधिकारी आणि यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्यासोबत पाणी सोडण्या संदर्भात वारंवार बोलणे झाले मात्र काही तांत्रिक बाबींमुळे पाणी हे शेवटपर्यंत पोहचले नाही . त्या संदर्भात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आज दिनांक 21 एप्रिल रोजी एसडीओ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती .


सदर बैठकीस आमदार किसनराव वानखेडे यांनी व भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी पाणी सुटल्यानंतरही पाणी शेवटच्या टोकापर्यंत का पोहोचले नाही याचा जाब अधिकाऱ्यांना यावेळी विचारून यावर येत्या तीन दिवसात उपाययोजना राबवून पाणी नागरिकांना मिळाले पाहिजे यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील या संदर्भात चर्चा केली असता तीन दिवस सर्व विभागाचे पथक घेऊन नदीकाठावरील सोडण्यात आलेले पाणी कुठे कुठे नदी नाले व बंधाऱ्यामध्ये अडविले असल्याचे दिसून येतात ते बंधारे ते नाले संबंधित शेतकरी यांना मोकळे करून देण्याच्या सूचना देण्यात येतील तसेच दोन्ही कडील विदर्भ व मराठवाड्या कडील मोटर पंप यांचा विज पुरवठा हा त्वरित खंडित करण्याचे निर्देशही यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

ईसापुर धरणात सध्या 52 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे .जर पाणीटंचाई संदर्भात काही तक्रारी आल्या तर त्यांची शहानिशा करून त्वरित त्यावर उपाययोजना शोधण्याचेही यावेळी मुळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या .यावेळी अधिकाऱ्यांना कडक शब्दात आमदार किसनराव वानखेडे यांनी सांगितले की, ईसापुर धरणाचे पाणी नदी पात्रात आले असताना देखील शेवटपर्यंत पाणी का पोहोचले नाही अनेक तक्रारी गावागावातून येत आहेत . त्यामुळे त्वरित पथके निर्माण करून येत्या तीन दिवसात पाणी शेवटपर्यंत पोहोचले पाहिजे असे निर्देश दिले असून कुठूनही पाण्यासंदर्भात तक्रारी आल्या नाही पाहिजे याची दक्षता येणाऱ्या या दीड महिन्यात अधिकाऱ्यांनी द्यावी पाणीटंचाई संदर्भात जनतेची ओरड कुठेतरी थांबली पाहिजे यासाठी ही अधिकाऱ्यांनी समोर येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले .

सदर बैठकीस माजी आमदार विजय खडसे, विनायक राणे, सुदर्शन रावते ,यासह सावळेश्वर, माणकेश्वर ,कोटा तांडा ,मुरली या गावातील नागरिकासह उद्धर्व पैनगंगा प्रकल्प कार्यालय विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता अभय जगताप ,तहसीलदार राजेंद्र सुरडकर ,गटविकास अधिकारी किरण कोळपे, महावितरणचे कार्यकारी अभियंता जैन , उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे सचिन मुटकुळे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता . याच पद्धतीची बैठक हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कोहळीकर व किनवट माहूर विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमरावजी केराम यांनी घ्यावी व ईसापुर धरणाचे पाणी सहस्त्रकुंड, परोटी भंडारवाडी, पिंपरी पर्यंत कसे पोहोचेल याची सुद्धा दक्षता घ्यावी अशा स्वरूपाची मागणी आता किनवट तालुक्यातून व हिमायतनगर तालुक्यातून पुढे येत आहे.
या बैठकीत येत्या तिन दिवसात शंभर टक्के पाणी शेवटच्या टोकावरील मुरली , परोटी पर्यंत पोहचेल यासाठी कर्मचारी पथके निर्माण करून नदिकाठावर प्रत्यक्ष जावुन पाहणी करून अनाधिकृत मोटर पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करणे , अडविलेले बंधारे मोकळे करणे हे राबविण्यात येणार आहे . त्यामुळे पाणीटंचाई तालूक्यात नाही केवळ उपाययोजना होत नसल्यानेच आज प्रशासनाला निर्देशीत केले आहे .
मुळात इसापूर धरणाचे पाणी सुटले आहे परंतू ज्या कारणाने पाणी टेलपर्यंत पोहचले नाही त्यामुळे ते शोधण्यासाठी व तालूका पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे . सखाराम मुळे, उपविभागीय अधिकारी, उमरखेड.