तरुणांनी पुस्तकांच्या अधिक जवळ गेले पाहिजे ना. हेमंत पाटील 21 वे लोकसंवाद साहित्य संमेलन थाटात संपन्न

IMG 20260113 WA0001 तरुणांनी पुस्तकांच्या अधिक जवळ गेले पाहिजे ना. हेमंत पाटील 21 वे लोकसंवाद साहित्य संमेलन थाटात संपन्न

नांदेड, गौतम कदम l सोशल मीडियाच्या नादात लागून आपले आयुष्यभर बरबाद करून घेण्यापेक्षा तरुणांनी पुस्तकांच्या अधिक जवळ जाऊन स्वतःला घडत राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत अशी रास्ता अपेक्षा विधान परिषदेचे गटनेते नामदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली. नांदेड येथील पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य नगरीत पार पडलेल्या 21व्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात ते बोलत होते.

यावेळी संमेलन अध्यक्ष प्रा. रविचंद्र हडसनकर , पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे , अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यकारिणी सदस्य देविदास फुलारी , प्रा. डॉ. जगदीश कदम , मावळते अध्यक्ष प्रा.महेश मोरे , सदाशिवराव धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे , एडवोकेट एल.जी. पुयड आदींची उपस्थित होते. स्वागत अध्यक्ष गजानन पाम्पटवार आणि आयोजक दिगंबर कदम यांच्या नीटनेटक्यास आयोजनामध्ये 21 वे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन संस्मरणीय ठरले.

सकाळी भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यात महाराष्ट्राची परंपरा दाखवणाऱ्या वेशभूषणे लक्ष वेधले होते. लेझीम पथक , टाळ मृदंगाच्या नादात छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण केलेले अश्वारूढ जिवंत देखाव्याने साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीत रंगत आणली. संतोष तळेगावे यांच्या माणिक मोती या विशेष प्रदर्शनाचेही यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर साहित्य संमेलनाचे उद्घाटनात बोलताना नामदार हेमंत पाटील पुढे म्हणाले की, आजचा काळ हा आत्मचिंतनाचा काळ आहे. देशाच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी ज्या तरुणांवर आहे ती तरुण पिढी मोठ्या प्रमाणात भरकटत आहे. व्यसनाधीन होत आहे.

त्यामुळे तरुणांनी आपली योग्य दिशा ठरवणे आवश्यक आहे. यासाठी पुस्तकांशिवाय यांनी कोणताही पर्याय नाही. जगातील सर्व यशाचा मार्ग हा पुस्तकातूनच जातो. साहित्यिक , लेखक, कवी, कादंबरीकार , विचारवंत , राष्ट्रपुरुष यांच्या सानिध्यात आपण राहू शकत नसलो तरी त्यांनी निर्माण केलेले साहित्य आपल्याला जगण्याचा आणि प्रगल्भ होण्याचा मार्ग दाखवत असतात. अशा प्रकल्प मार्गावर आपण चारायला लागलो की स्वतःचे , कुटुंबाचे आणि देशाचे हित होते. त्यासाठी प्रत्येकाच्या हाती पुस्तक असायलाच पाहिजे असेही ते म्हणाले.
अनुपमा बन यांच्या एकपात्रीने साहित्य संमेलनामध्ये उपस्थित त्यांच्या काळजाचा ठेका चुकवला. प्रा. स्वाती कान्हेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन सत्राने दाद मिळवली तर योगीराज माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनाला उदंड प्रतिसाद मिळाला.

21व्या साहित्य संमेलनात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे संचालक मराठी विभागाचे प्रपाठक डॉ .पी विठ्ठल यांची ऋषिकेश देशमुख यांनी घेतलेली मुलाखत लक्षवेधी ठरली. साहित्य संमेलनात नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक विभागातून साहित्य प्रेमींची मोठी उपस्थिती होती. दरम्यान याचवेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा लोकसंवाद जीवन गौरव आणि लोकसंवाद 2026 पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला . सूत्रसंचालन प्रा. धाराशिव शिराळे आणि पत्रकार राम तरटे यांनी केले.

यावेळी संयोजक दिगंबर कदम यांनी लोकसंवाद ची भूमिका विशद केली. स्वागताध्यक्ष गजानन पाम्पटवार यांनी साहित्य चळवळीला बळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगून पाम्पटवार कुटुंबीय केवळ आर्थिक गुंतवणूक करतात असे नाही तर ज्ञानवृद्धीसाठी व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी हातभार लावणारे आहे हे स्पष्ट केले .

संमेलन यशस्वीतेसाठी लोकसंवाद परिवार व पाम्पटवार शैक्षणिक संकुलातील प्राचार्य , सर्व प्राध्यापक , कार्यालयीन स्टॉप यांनी विशेष परिश्रम घेतले . रसिकांनी मंडप खचाखच भरला होता. विविध स्टॉलने संमेलनाची उंची वाढवली.यावेळी प्रा. डी.बी. जांभरुणकर व शिवाजीराव कपाळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर डॉ. ललिता सुस्कर , सतीश दर्शनवाढ , राजीव सूर्यवंशी , संतोष गिरी , डॉ. अशोक कदम , पोनी उदय खंडेराय , सपोनी पांडुरंग माने , दिगंबर देशमुख , भाऊराव मोरे यांना लोकसंवाद पुरस्काराने गौरविण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top