नांदेड| जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि वसतिगृह प्रवेश प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळावे, यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.



शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह संबंधित योजनांचे काम पाहणाऱ्या महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळांना उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. कार्यशाळेत शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया, स्वाधार योजना, वसतिगृह प्रवेश, अर्ज करताना येणाऱ्या अडचणी तसेच योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.



तालुकानिहाय कार्यशाळांचे वेळापत्रक – मंगळवार यशवंत महाविद्यालय, बाबानगर, नांदेड येथे दुपारी १२ ते २ या वेळेत कार्यशाळा होणार आहे. त्यानंतर पीपल्स कॉलेज ऑफ सायन्स, स्नेहनगर, नांदेड येथे दुपारी २ ते ४ या वेळेत कार्यशाळा होईल. यामध्ये नांदेड व अर्धापूर तालुक्यातील जिल्हा व तालुकास्तरीय महाविद्यालयांचा समावेश राहणार आहे.
बुधवार, १९ ऑगस्ट : नूतन महाविद्यालय, उमरी येथे दुपारी १२ ते २ या वेळेत कार्यशाळा होईल. यामध्ये मुदखेड, भोकर, उमरी व धर्माबाद तालुक्यातील महाविद्यालयांचा समावेश राहणार आहे. गुरुवार, २० ऑगस्ट : दत्त कला व वाणिज्य महाविद्यालय, हदगाव येथे दुपारी १२ ते २ या वेळेत कार्यशाळा होणार असून हिमायतनगर व हदगाव तालुक्यातील महाविद्यालये सहभागी होतील. शुक्रवार, २१ ऑगस्ट : जनता कॉलेज, नायगाव येथे दुपारी १२ ते २ या वेळेत कार्यशाळा होईल. नायगाव, मुखेड, देगलूर व बिलोली तालुक्यातील महाविद्यालयांचा यात समावेश आहे.



सोमवार, २४ ऑगस्ट : सरस्वती महाविद्यालय, किनवट येथे दुपारी १२ ते २ या वेळेत कार्यशाळा होणार असून माहूर व किनवट तालुक्यातील महाविद्यालयांचा समावेश राहील. मंगळवार, २५ ऑगस्ट : संत गाडगेबाबा महाविद्यालय, लोहा येथे दुपारी १२ ते २ या वेळेत कार्यशाळा होईल. लोहा व कंधार तालुक्यातील महाविद्यालये सहभागी होतील. मंगळवार, १५ सप्टेंबर : एमजीएम महाविद्यालय, नांदेड येथे दुपारी १२ ते २ या वेळेत कार्यशाळा होणार असून नांदेड शहर व तालुक्यातील उर्वरित महाविद्यालयांचा यात समावेश राहणार आहे.
योजनांपासून विद्यार्थी वंचित राहू नयेत – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून भारत सरकार शिष्यवृत्तीच्या अर्ज प्रक्रियेबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तालुकास्तरावरील प्रत्येक विद्यार्थ्याला जिल्हास्तरीय कार्यालयात प्रत्यक्ष येणे शक्य नसल्याने महाविद्यालयांच्या माध्यमातून ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
यासोबतच नशामुक्त अभियानांतर्गत शपथ अभियान देखील कार्यशाळांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजना शासन निर्णयानुसार राबविण्यात येत असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२४-२५ पासून महाआयटी पोर्टलवर महाराष्ट्र स्तरावर ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना योजनांची योग्य माहिती मिळून ते शिष्यवृत्ती, स्वाधार योजना किंवा वसतिगृह प्रवेशाच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थी व संबंधित कर्मचाऱ्यांची कार्यशाळेतील उपस्थिती सुनिश्चित करावी, असे आवाहन सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

