कंधार (सचिन मोरे) विधानसभा निवडणूक २०२६ ची लढवण्यासाठी मी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लोहा- कंधार विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली होती. पण काही कारणास्तव यश आले नाही. त्यातच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी कडून माझी उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. पण इतरांचा हक्क हिरावणे हे माझ्या तत्त्वात नव्हते. आम्ही जात-पात मानत नाही.

जातीयवादी,धर्मवादी पक्षाचे आमचे विचार जुळत नाहीत. त्यामुळे ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून हजारो गोरगरीब, कष्टकरी दिन- दुबळ्यांची सेवा करत त्यांचे अश्रू पुसण्याचे काम आम्ही करणार असून पत्रकार हे माझ्या कुटुंबाचे घटक असून त्यांचे मार्गदर्शन घेऊन लवकरच आगामी राजकीय भूमिका ठरवणार असल्याची भावनिक उद्गार ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य संजय पवार यांनी काढले.

प्राचार्य संजय पवार व सौ संगीताताई पवार यांच्या वतीने पवार निवास पोलीस कॉलनी कंधार येथे दि २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार बांधवांच्या सत्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष म्हणून दैनिक सकाळचे हाफीज घडीवाला, प्राचार्य संजय पवार, सौ संगीताताई पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित सर्व पत्रकारांचा शाल,श्रीफळ,पेन व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.



पुढे बोलताना पवार म्हणाले साठ वर्षांपूर्वी माझे वडील कै. शिवराम पवार यांनी अतिशय खडतर परिस्थितीशी झुंज देत नेहरूनगर तालुका कंधार येथे ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करत शाळा काढली. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेत वाडी तांड्यावरील गोर- गरिबांचे हजारो लेकरे आज महाराष्ट्रात मोठ- मोठ्या पदावर विराजमान झाले असून ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझे वडील कै. शिवराम पवार हे कृषी उत्पन्न बाजार समिती कंधारचे अनेक वर्ष सभापती, खरेदी विक्री संघाचे सभापती, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यासह अनेक पदी भूषवीत त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली. त्यांनी कायम गोरगरिबांची सेवा केली त्यांचा आदर्श घेत आम्ही जनतेच्या सेवेत कायम राहणार असल्याचे प्रा.पवार यांनी यावेळी सांगितले.

आमच्या जडणघडणीमध्ये पत्रकार बांधवांचा मोठा वाटा असून आजपर्यंत कुठलेही अपेक्षा न बाळगता पत्रकारांनी कै. शिवराम पवार यांच्यासह पवार परिवारास लाख मोलाची साथ दिलेली आहे. पवार परिवारास सतत प्रसिद्धी देऊन आम्हाला बळ देण्याचे काम कंधार तालुक्यातील तमाम पत्रकार बांधवांनी केलेले आहे.ही बाब आमच्या कायम स्मरणात राहणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार उत्तम चव्हाण यांनी केले तर आभार संगीताताई पवार यांनी मानले.यावेळी कंधार तालुक्यातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
पत्रकार बांधव हे माझ्या कुटुंबीयाचे घटक असून आज पर्यंत आमच्या प्रत्येक वाटचालीत कंधार येथील पत्रकार मित्रांनी पवार परिवारास अत्यंत तोला-मोलाची साथ दिली आहे. त्यांचे ऋण मी कदापी फेडू शकणार नाही. पत्रकार बांधवांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार असून त्यांच्या समस्या,अडी- अडचणी सोडवण्यासाठी एक मोठा भाऊ म्हणून काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

