Wednesday, May 13

Why is it so sour when the safe is shaking? तिजोरीत खडखडात असतांना उगाच खटाटोप कशाला? -NNL

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नांदेड, यांच्या वतीने योजना माहिती केंद्र सर्व शासकीय कार्यालयात राबविण्यात येत आहेत, परंतु लोकांना माहित असलेल्या व कार्यान्वित असलेल्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही हे वास्तव परिस्थिती आहे.

याकडे शासन आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. संजय गांधी निराधार योजना, रमाई आवास योजना,भारतरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,श्रावणबाळ योजनासह विविध योजना आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाहीत दोन दोन महिने उशीरा मिळतात, सोईनुसार विधवा, परितकत्या महिलांची नावे पात्र केली जातात किंबहुना पीडित महिलांचा अवमान केला जातो.

गरजू व बेघर व्यक्तींना रमाई आवास योजनेचा लाभ वेळेवर दिला जात नाही. त्यांना आंदोलन किंवा उपोषण करण्याची वेळ येते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा निधी विध्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षात मिळत नाही, एक – दोन वर्ष उशीरा मिळतो त्यासाठी ही उपोषण आणि मोठ मोठे आंदोलन करावे लागतात. अट्रॉसिटी पीडितांना देखील आर्थिक मदत मिळावी म्हणून आंदोलन करावे लागते ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्थिती म्हणजे स्वातंत्र्यावर शंका येण्यासारखा प्रकार आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या काळात सर्वच योजणांची माहिती सर्व विध्यार्थी, आणि नागरिकांना माहित असतांना स्टॉल लावून देखावा करण्याचे नाटकी प्रयोग समाज कल्याण विभाग करीत आहे. सरकारने नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आणल्या आणि त्यांचा प्रचार प्रसार लाखो रुपये खर्च करून “योजना माहिती केंद्रा मार्फत केला जात आहे” ही बाब जनतेच्या पैशावर मारलेला डल्लाच आहे.

सध्यस्थीतीत सरकारचा दोन तीनच योजनेच्या अंमलबजावनीवर जोर असून,त्या म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना. आमची विनंती आहे हे की,समाजकल्याण सहाय्यक आयुक्त, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड आणि जिल्हा प्रशासनाने नांदेड जिल्हाचे सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाचे स्वाधार,अट्रॉसिटी व रमाई आवास योजनेचे उदिष्ट सरकारने अजून पूर्ण केले नाही. ते अगोदर पूर्ण करणे आवश्यक आहे. त्या संदर्भात अधिकऱ्यांनी सरकारशी बोलून पत्रव्यवहार करावा आणि तात्काळ उदिष्ठ करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी व गरजू आणि पीडित व्यक्तींना लाभ मिळवून द्यावा.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा २०२३-२०२४ चा निधी तात्काळ मंजूर करून पात्र विध्यार्थ्यांना आधार देण्यात यावा.संजय गांधी निराधार योजनेचे पैसे प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत देण्यात यावे. सरकार आणि प्रशासन यांनी शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी काटेकोर पणे करावी. याकडे लक्ष दिले तर नक्कीच सर्व योजनांचा लाभ महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना मिळेल आणि विविध कार्यालयात स्टॉल लावून देखावा करण्याची गरज पडणार नाही. अन्यथा आगामी निवडणुकीत परिणाम दिसून येतील येवढे मात्र खरे!

लेखक …. कॉ. श्याम ए. सरोदे, कार्याध्यक्ष – नांदेड जिल्हा असंघटित कामगार संघटना (सीटू)तथा
DYFI नांदेड. , मो.७०८३३२४१५०, दिनांक : ६ सप्टेंबर २०२३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!